२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे २५ पर्यटकांच्या नृशंस हत्येचा बदला म्हणून भारताने ७ मे च्या पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ आणि मुख्यालयांनर हल्ले केले. यात प्रामुख्याने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनांना यात लक्ष्य केले गेले. पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी आस्थापनांवर हल्ले केलेले नाहीत, असे भारतीय संरक्षण खात्याने नमूद केले आहे. उरी २०१६ सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट २०१९ हवाई हल्ले यानंतर दहशतवादी हल्ल्यांना लष्करी कारवाईने प्रत्युत्तर देण्याची भारताची ही तिसरी वेळ आहे.
नऊ ठिकाणे, पहाटेचे हल्ले
उरीनंतरचे सर्जिकल स्ट्राइकआणि बालाकोट हवाई हल्ले यांची व्याप्ती मर्यादित होती. यावेळी पाकिस्तानातील ५ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ४ ठिकाणांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार, पाकिस्तान पंजाबमधील बहावलपूर आणि मुरीदके, पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथील दहशतवादी तळांवर भारताने हल्ले केले. यांतील पाकिस्तानमधील ठिकाणे ही जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनांची मुख्यालये आहेत. जैश आणि ‘लष्कर’ या संघटनांनीच स्थापलेला दि रेझिस्टन्स फोर्स या संघटनेच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर अमानुष गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अचूक लक्ष्यभेद
अलीकडच्या युद्धांमध्ये परवलीच्या बनलेल्या ‘प्रिसिजन म्युनिशन’ अर्थात अचूक लक्ष्यभेद करणाऱ्या स्फोटकांचा ऑपरेशन सिंदूरमध्ये वापर करण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, हे हल्ले क्षेपणास्त्रे डागून केले गेले. या कारवाईत लढाऊ विमानांचा वापर केला गेल्याचेही वृत्त आहे. अत्याधुनिक दिशादर्शन, लक्ष्यनिश्चिती, उपग्रहांचा वापर करून अशा कारवाईत नेमकेपणा आणला जातो. यात समांतर नुकसान (कोलॅटरल डॅमेज) कमीत कमी होईल, सर्वसामान्य मनुष्यहानी होणार नाही याकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाते.
दहशतवादावर सर्जिकल स्ट्राइक
उरीनंतर आणि बालाकोट येथील हल्ल्यांप्रमाणेच ऑपरेशन सिंदूरचे स्वरूपही मर्यादित पण प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांचेच होते. मात्र बालाकोटनंतर प्रथमच भारताने पाकिस्तानची सीमा ओलांडून कारवाई केली. बालाकोट हे ठिकाण पाकिस्तानातील खैपर पख्तुनख्वा या प्रांतात येते. तर ताजी कारवाई ही पाकिस्तान पंजाब प्रांतात करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत युद्धभडका उडणार नाही हे भारताचे वर्षानुवर्षांचे धोरण राहिलेले आहे. मात्र नरेंद्र मोदी सरकारने दहशतवादी हल्ल्यांना लष्करी कारवाईने प्रत्युत्तर देण्याचे गेल्या काही दशकांतील नवे धोरण अवलंबले आहे.
पाकिस्तान काय करणार?
बालाकोटप्रमाणेच ऑपरेशन सिंदूरलाही पाकिस्तानकडून काही ना काही प्रमाणात प्रत्युत्तर दिले जाईल हे उघड आहे. बालाकोटनंतर भारत आणि पाकिस्तानी हवाई दलांमध्ये छोटी लढाई झाली होती. यावेळच्या कारवाईदरम्यान भारताची काही लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर, तसेच प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानने तोफगोळ्यांचा माराही सुरू केला आणि यात काही भारतीय नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ हे पंजाबचेच. त्यांच्या दृष्टीने हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर हे गेल्या काही दिवसांमध्ये भारताविरुद्ध गरळ ओकत आहेत. त्यांच्या कार्यकाळात हा हल्ला झाल्यामुळे स्वतःच्या प्रतिभासंवर्धनासाठी त्यांनाही काहीतरी करून दाखवावे लागेल.
पाचव्या युद्धाची शक्यता किती?
१९४७-४८, १९६५, १९७१ आणि १९९९ अशी चार युद्धे आणि युद्धसदृश कारवाया भारत आणि पाकिस्तानदरम्यान घडलेल्या आहेत. यांतील १९४७-४८ आणि १९९९मध्ये सुरुवातीस पाकिस्तानने ‘आपले लष्कर यात सहभागी नाही’ असा दावा केला होता, जो नंतर फसला. १९६५ आणि १९७१मध्ये मात्र दोन्ही देशांदरम्यान पूर्ण क्षमतेचे युद्धच झाले होते. यात १९७१ मध्ये पाकिस्तानचा मानहानिकारक पराभव झाला होता. १९४७-४८ आणि १९६५मध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले, पण युद्ध अनिर्णित राहिले. १९९९मध्येही पाकिस्तानी लष्कराला भारतातील घुसखोरी महागात पडली आणि माघार घ्यावी लागली होती. हा अनुभव गाठीशी असल्यामुळे, आणि दरम्यानच्या काळात दोन्ही देशांनी लष्करी सामर्थ्यात वाढ केल्यामुळे पूर्ण क्षमतेचे युद्ध लढणे पाकिस्तानला खूप जड जाईल असे दिसते. भारताने मर्यादित आणि संयमी कारवाई केल्यामुळे प्रत्युत्तर देताना संयम सोडला, तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाचा मर्यादित पाठिंबाही मिळणार नाही. पाकिस्तानच्या अणुसामर्थ्याबद्दल तेथील नेते, मुत्सद्दी आणि लष्करी अधिकारी कितीही बाता मारत असले तरी भारतही अण्वस्त्रसज्ज आहे आणि संख्यात्मक वर्चस्व राखून आहे. शिवाय सध्याच्या पाकिस्तानला असे युद्ध आर्थिक दृष्ट्या अजिबात परवडणारे नाही.