A Pakistani Missile Found In India: ६ ते १० मे दरम्यान झालेल्या अल्पकालीन पण तीव्र भारत-पाकिस्तान संघर्षाच्या गोंधळात एक महत्त्वाचा पुरावा समोर आला आहे आणि त्यामुळे सध्या बीजिंगमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. अर्थात चीन अस्वस्थ आहे.
या संघर्षादरम्यान पाकिस्तानच्या हवाई दलाने डागलेल्या आणि चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या PL-15E या ‘बियॉन्ड व्हिज्युअल रेंज’ एअर-टू-एअर क्षेपणास्त्राचे तुकडे पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील कामाही देवी गावाजवळ भारतीय अधिकाऱ्यांना सापडले आहेत.
या क्षेपणास्त्राचे बहुतांश अवशेष सुस्थितीत होते. त्यामध्ये ड्युअल-पल्स मोटर, डेटालिंक, इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टिम आणि सर्वात महत्त्वाचा घटक ‘AESA रडार सीकर’ हेही व्यवस्थिती होते.
चिनी क्षेपणास्राचा मेंदू व इंजिन दोन्ही भारताच्या ताब्यात
आता भारताकडे चीनच्या सर्वात अत्याधुनिक हवाई क्षेपणास्त्राचा मेंदू आणि इंजिन दोन्ही आहेत आणि ही बाबच चीनसाठी मोठी चिंताजनक ठरली आहे.
बीजिंगसाठी एक भीषण दु:स्वप्न
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने राफेल, सुखोई-३० एमकेआय आणि मिराज ही डझनभर लढाऊ विमाने वापरली. या विमानांवर मेटिओर क्षेपणास्त्रे, स्काल्प क्रूझ आणि हॅमर बॉम्ब होते. पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून चीनकडून पुरवलेली जे-१०सी आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने वापरली. PL-15E या २०० किलोमीटरहून अधिक पल्ल्याच्या लेझर गायडेड क्षेपणास्त्रांनी सज्ज होती. या संघर्षात डागले गेलेले हे क्षेपणास्त्र भारतीय विमानांना लक्ष्य करण्यासाठी डागलेले होते, ते पूर्णपणे सुस्थितीत भारताच्या हद्दीत सापडले.
या घटनेमुळे चीनचे अत्यंत गोपनीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञान भारताच्या डीआरडीओच्या प्रयोगशाळेत सहजच पोहोचले आहे. त्यामुळे जागतिक शक्तींचे याकडे बारकाईने लक्ष लागले आहे.

जगाला या अवशेषांचा तुकडा हवा आहे
संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनुसार, ‘फाइव्ह आइज’ आघाडीतील देश म्हणजे अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड तसेच जपान आणि दक्षिण कोरिया यांनी अनौपचारिकपणे या क्षेपणास्त्राच्या अवशेषांमध्ये रस दाखवला आहे.
त्यांचा प्रमुख उद्देश कोणता?
- AESA रडार सीकर आणि ड्युअल-पल्स प्रपल्शन टेक्नॉलॉजी चीनने वापरली असून युरोपीय राष्ट्रांकडील तंत्रज्ञानापेक्षा ती अधिक प्रगत मानली जाते. त्या तंत्रज्ञानाची मुख्य वैशिष्ट्ये जाणून घेण्यात या देशांना रस आहे.
- चीनच्या सरकारी मीडियाने या घटनेची माहिती फारशी दिलेली नाही, तरी चिनी लष्करी यंत्रणेत या घटनेमुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे. AVIC या संस्थेद्वारे विकसित आणि अमेरिका निर्मित AIM-120D तसेच युरोपियन मेटिओर क्षेपणास्त्रांना पर्याय म्हणून सादर केलेले PL-15E आता प्रत्यक्ष युद्धात वापरण्यात आले आणि त्याचे तंत्रज्ञान गोपनीय न राहता आता उघड झाले आहे.
- भारतीय संरक्षण शास्त्रज्ञांसाठी चिनी प्रगत तंत्रज्ञानाची उकल करण्याची ही एक दुर्मीळ संधी आहे. या महत्त्वाच्या तंत्रज्ञान घटकांच्या मदतीने, भारताची अस्त्र Mk II यासारख्या क्षेपणास्त्र विकास प्रकल्पांना मोठी मदत मिळू शकते. विशेषतः रडार जॅमिंग विरोध, सीकर तंत्रज्ञान आणि लांब पल्ल्याच्या प्रपल्शन सिस्टममध्ये याची मदत होऊ शकते. एवढ्यावरच न थांबता, भारतीय अभियंते आता चीनच्या गाजलेल्या क्षेपणास्त्र प्रणालीचे प्रत्यक्ष युद्धातील कार्यक्षमतेचे मूल्यमापन करू शकतात आणि त्यातील काही कमकुवत बाबीही उघड करू शकतात. ही बाब चिनी लष्कराची चिंता वाढवणारी आहे.
बीजिंगची सावध प्रतिक्रिया
- चीनच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबतीत अतिशय तोलूनमापून प्रतिक्रिया दिली आहे. प्रवक्ते झांग शियाओगांग यांनी या क्षेपणास्त्राच्या अपयशाबाबत किंवा ते भारताच्या हाती लागण्याबाबत थेट काहीही भाष्य केले नाही. त्याऐवजी त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आणि म्हटले आहे, “भारत आणि पाकिस्तान हे असे शेजारी आहेत जे एकमेकांपासून दूर जाऊ शकत नाहीत… चीन या परिस्थितीत एक विधायक भूमिका बजावण्यास तयार आहे.”
- मात्र त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट कबूल केली की, PL-15E क्षेपणास्त्र यामध्ये प्रत्यक्ष वापरण्यात आले होते. हा त्या क्षेपणास्त्राचा पहिला वापर ठरला आहे.
- SIPRI (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट) ने दिलेल्या माहितीनुसार, आज पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीपैकी तब्बल ८१% भाग चीनकडून येतो, तर काही वर्षांपूर्वी हा आकडा ७४% होता. यामध्ये पाकिस्तानची अर्ध्याहून अधिक लढाऊ विमाने (JF-17, J-10C), PL-15E सारखी क्षेपणास्त्र प्रणाली, हवाई संरक्षण यंत्रणा आणि उपग्रह आधारित क्षमता यांचा समावेश होतो. इतकेच नव्हे, तर मे महिन्यातील संघर्ष शिगेला पोहोचला तेव्हा चीनने झपाट्याने नवीन PL-15E क्षेपणास्त्रे पाकिस्तानकडे पाठवली, हे वृत्तदेखील समोर आले आहे. ही बाब चीनने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्याचाच एक भाग होती.
आता पुढे काय होणार?
या क्षेपणास्त्राचे अवशेष चीनसाठी धोकादायक ठरू शकतात. तर, भारतासाठी ही तांत्रिक संधी आणि दक्षिण आशियातील शस्त्रस्पर्धेच्या इतिहासातील एक निर्णायक टप्पा मानला जाईल. या घटनेमुळे एक महत्त्वपूर्ण बदल अधोरेखित होतो, तो म्हणजे आता युद्धासाठी भूप्रदेशात घुसखोरीची गरज नाही. क्षेपणास्त्रे, ड्रोन, रडार आणि क्षेपणास्त्राच्या अवशेषांमध्ये दडलेल्या गुपितांद्वारेही युद्ध लढले जाऊ शकते.
चीनच्या शस्त्राने आवाज केला आहे. परंतु, तो आवाज बीजिंगला मात्र अपेक्षित नव्हता हे खरं!