ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ)चे आमदार अमिनुल इस्लाम यांना बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) ताब्यात घेण्यात आले. २४ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती.
ढिंगचे आमदार असलेले इस्लाम यांनी एका राजकीय रॅलीत पहलगामचा हल्ला हे केंद्र सरकारचे षड्यंत्र असल्याचे म्हटले होते. या वक्तव्याप्रकरणी त्यांना कलम १५२ नुसार अटक करण्यात आली होती. भारतीय न्याय संहितेचे कलम १५२ हे भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणाऱ्या कृत्यांशी संबंधित आहे; हा आरोप देशद्रोहासारखाच आहे.
अशाप्रकारे दहशतवादी हल्ल्याबाबत भाष्य किंवा सोशल मीडिया पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आलेले इस्लाम हे राज्यातील पहिले व्यक्ती आहेत. या अटकेची संख्या आता ६० वर पोहोचली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या अटकसत्राबद्दल वारंवार ट्विट केले आहे. बुधवारी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चार जणांना अटक करण्यात आली होती, अशी पोस्ट त्यांनी केली होती. “देशद्रोहींवर कारवाई सुरूच आहे… त्यांच्या या देशद्रोही कारवायांसाठी त्यांची विशेष काळजी घेतली जाईल”, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
एनएसएची कारवाई
इस्लाम यांना देशद्रोहाच्या प्रकरणात नागाव न्यायालयातून जामीन मिळाला. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. नागावचे सहाय्यक पोलिस स्वप्नील डेका यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “त्यांना आज जामीन मिळाला होता, पण त्यानंतर आम्हाला एनएसएअंतर्गत त्यांच्यावर नजरकैदेचा आदेश मिळाला, त्यामुळे त्यांना आता पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे आणि ते नागाव मध्यवर्ती तुरुंगात आहेत.”
एनएसएअंतर्गत अधिकाऱ्यांना औपचारिक आरोपाशिवाय आणि खटल्याशिवाय १२ महिन्यांपर्यंत एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार असतो.
नागाव जिल्हा दंडाधिकारी नरेंद्र कुमार शाह यांनी जारी केलेल्या अटकेच्या आदेशात पोलिसांच्या अहवालाचा हवाला देण्यात आला आहे. यात असे म्हटले आहे की, “ते सार्वजनिक सुव्यवस्था आणि राज्याच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे.” त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी इस्लामला एनएसएच्या कलम 3(2) अंतर्गत ताब्यात घेण्याचे आणि तात्काळ प्रभावाने नागाव मध्यवर्ती कारागृहात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एआययूडीएफने या प्रकरणात इस्लाम यांना पाठिंबा देण्यापासून नकार दिला आहे. एआययूडीएफ हा आसाममधील प्रादेशिक पक्ष आहे. त्याचा मुख्य आधार राज्यातील बंगालीवंशाचा मुस्लीम समुदाय आहे. पुढील वर्षी होणारी आसाम विधानसभा निवडणूक जवळ येत असताना हे हल्ले तीव्र होणार आहेत.
ढिंग येथील आमदारांच्या वक्तव्यांपासून पक्षाला दूर करत एआययूडीएफच्या सरचिटणीसांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “त्यांच्या भाषणात इस्लाम यांनी भारतीय व्यवस्थेविरुद्ध विधाने केली आणि पहलगाम हल्ला हा भारत सरकारचंच एक कृत्य होतं असा संशय व्यक्त केला. जेव्हा दुसऱ्या देशासोबत युद्धासारखी परिस्थिती आहे, तेव्हा त्यांनी या मुद्द्याचे राजकारण करणे योग्य नव्हते. आता हा कायद्याचा विषय आहे आणि कायदा त्याचे काम करेल, यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.”
२०११ पासून आमदार इस्लाम हे अनेक वादग्रस्त प्रकरणात अडकले आहेत. २०२० मध्येही राज्यातील भाजपा सरकारने त्यांना एका ऑडिओ क्लिपसाठी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. आसाममधील कोविड क्वॉरंटाइन केंद्रे ही राज्याच्या कागदपत्रांशिवाय स्थलांतरितांसाठी असलेल्या डिटेंशन सेंटरपेक्षा वाईट आहेत आणि सरकार मुस्लिमांविरुद्ध षड्यंत्र रचत आहे. तसंच तबलिगी जमातशी संबंधित लोकांना एकटे पाडत आहे”, असे इस्लाम यांनी त्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले होते. या क्लिपमध्ये त्यांनी असा आरोपही केला होता की, राज्य सरकार क्वॉरंटाइनमध्ये असलेल्या व्यक्तीला मारू शकते आणि नंतर असे म्हणू शकते की ती व्यक्ती करोना व्हायरसमुळे मरण पावली. त्यावेळीही एआययूडीएफने इस्लाम यांच्या त्या विधानांपासून अंतर राखले होते.