पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय निवडणूक होणार आहे. याच निवडणुकीच्या माध्यमातून पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांची निवड केली जाणार आहे. पाकिस्तानच्या निवडणुकीवर लष्कराचा मोठ्या प्रमाणात प्रभाव असतो. या निवडणुकीकडे भारताचेही लक्ष लागले आहे. कारण- पाकिस्तानच्या आगामी पंतप्रधानांची विचारधारा, त्यांचे धोरण यांवरच भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध अवलंबून असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या या निवडणुकीत लष्कराची भूमिका काय आहे? पाकिस्तानचे आगामी पंतप्रधान कोण होऊ शकतात? माजी पंतप्रधान इम्रान खान यांची स्थिती नेमकी काय आहे? हे जाणून घेऊ.

पाकिस्तानच्या निवडणुकीत लष्कराचा हस्तक्षेप

सध्या या निवडणुकीत साधारण १२.८५ कोटी मतदार असून, ते एकूण २६६ लोकप्रतिनिधींची निवड करणार आहेत. ६० जागा महिलांसाठी आणि १० जागा बिगरमुस्लिमांसाठी राखीव आहेत. पाकिस्तानच्या निवडणुकीत लष्कराची महत्त्वाची भूमिका असते. आपल्याला सोईस्कर व्यक्ती पंतप्रधानपदी यावी यासाठी तेथील लष्करप्रमुखाकडून प्रयत्न केले जातात. तर, भारताच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची नवनियुक्ती म्हणजेच खरे सत्ता हस्तांतर, असे भारताला वाटते.

Sharad Pawar group opposition to one country one election
शरद पवार गटाचा ‘एक देश एक निवडणूक’ला विरोध; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शपथनामा’ प्रसिद्ध
congress leader sonia gandhi choose rajya sabha fear of defeat polls says pm narendra modi
पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
congress bastar candidate kawasi lakhma
“यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा
lok sabha polls bjp tdp form alliance in andhra pradesh
आंध्र प्रदेशात जगनमोहन यांना शह देण्यासाठी चंद्राबाबूंची मोर्चेबांधणी

इम्रान खान यांची गच्छंती

पाकिस्तानी लष्कराकडून तेथील राजकारणात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला जातो. पसंतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी तेथील लष्कराकडून ‘हेराफेरी’ केली जाते, असाही आरोप केला जातो. याआधी २०१८ साली अशाच प्रकारची राष्ट्रीय निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत पाकिस्तानी लष्कराने माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पारड्यात आपले वजन टाकले होते. त्यानंतर पीएएमएल (एन) पक्षाचे नेते नवाज शरीफ निवडणुकीत पराभूत झाले होते; तर इम्रान खान हे पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकले होते.

इम्रान खान सध्या तुरुंगात

मात्र, सध्या मात्र इम्रान खान हे तुरुंगात आहेत. त्यांना बेकायदा भेटवस्तूंच्या गुन्ह्याखाली १४ वर्षे तर गुप्त माहिती फोडल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ते सध्या तुरुंगात असताना पाकिस्तानमध्ये पंतप्रधान या पदासाठी निवडणुका होत आहेत. इम्रान खान यांच्यावर मे २०२३ मध्ये अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या समर्थकांनी ठिकठिकाणी आंदोलने केली होती. या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली. लष्कराच्या संपत्तीवरही हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये लष्करातील वरिष्ठ जनरल यांच्या घराचाही समावेश होता. या घटनेनंतर पीटीआयच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान पीटीआयच्या अनेक कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई झाली. त्यामध्ये माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेश यांचादेखील समावेश होता. इम्रान खान यांच्या पक्षाची स्थिती सध्या बिकट झाली आहे. अनेकांनी या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर, लष्कराचे समर्थन मिळाल्यानंतर जहांगीर तारीन यांसारख्या नेत्यांनी आपला स्वत:चा नवा पक्ष काढला आहे.

नवाज शरीफ पुन्हा सक्रिय

पाकिस्तानच्या लष्काराने २०१८ साली इम्रान खान यांना पाठिंबा दिला होता. आता मात्र लष्कराने नवाझ शरीफ यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली आहे. त्यांनी याआधी तीन वेळा पंतप्रधानपद भूषविलेले आहे. गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात ते पाकिस्तानमध्ये परतले होते. लष्कराने याआधी १९९९ व २०१७ अशा दोन वेळा नवाझ शरीफ यांना पाठिंबा दिलेला आहे.

नवाझ शरीफ यांना पसंती

नवाझ शरीफ यांचे उद्योगांबाबत सकारात्मक विचार आहेत. अमेरिका आणि भारत या दोन देशांकडेही ते सकारात्मकपणे पाहतात. तसेच त्यांचे बंधू शाहबाज शरीफ हे याआधी देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत. गेल्या वर्षाच्या ऑगस्टमध्ये त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर अन्वर उल हक काकर हे पाकिस्तानचे नवे काळजीवाहू पंतप्रधान झाले. शाहबाज शरीफ यांची आपल्या कार्यकाळात प्रशासनावर चांगली पकड होती. या सर्व कारणांमुळे यावेळी नवाझ शरीफ हेच पंतप्रधापदी विराजमान व्हावेत, अशी पाकिस्तानी लष्कराची अपेक्षा आहे.

झरदारी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत

आसिफ अली झरदारी हे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांचे पुत्र बिलावल भुत्तो झरदारी हे PML(N)-PPP यांच्या युती सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते. या सरकारमध्ये शाहबाज शरीफ हे पंतप्रधान होते. झरदारी यांच्या पत्नी बेनझीर भुत्तो हयात असताना पीपीपी या पक्षाला मोठा जनाधार होता. आता मात्र तशी स्थिती नाही. हा पक्ष सध्या सिंध प्रांतापर्यंतच सीमित आहे. त्यामुळे त्यांची झरदारी यांची राष्ट्रपती होण्याची इच्छा पूर्ण होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पीटीआयच्या कार्यकर्त्यांचा छळ

ही निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शकपणे होईल का, असा प्रश्न पाकिस्तानमधील राजकीय तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. कारण- पाकिस्तानमध्ये इम्रान खान हे अजूनही प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तर काही कार्यकर्त्यांचा वेगवेगळ्या माध्यमांतून छळ केला जातोय. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाला त्यांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावरून निवडणूक लढविण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच या पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाहीये, असेदेखील वृत्त काही ठिकाणांहून येत आहे. सध्या इम्रान खान यांचा राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी पाकिस्तानचा निवडणूक आयोग, न्यायालय व पाकिस्तानी लष्कर अशा तिन्हींकडून प्रयत्न केला जात आहे. माध्यमांनादेखील त्यांच्या वृत्तांमध्ये इम्रान खान यांचे नाव न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

१२८ दशलक्ष मतदार

पाकिस्तान हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जगातील पाचवा देश आहे. या देशाची एकूण लोकसंख्या २४१ दशलक्ष त्यातील साधारण १२८ दशलक्ष हे नोंदणीकृत मतदार आहेत. त्यामध्ये ६९ दशलक्ष पुरुष मतदार; तर ५९ दशलक्ष महिला मतदार आहेत. मतदारांचे प्रमाण लक्षणीय असले तरी येथे प्रत्यक्ष मतदानाचे प्रमाण कमी आहे. २०१८ सालच्या राष्ट्रीय निवडणुकीत येथे ५२ टक्के मतदान झाले होते; तर १९७१ साली येथे सर्वाधिक ६१ टक्के मतदान झाले होते.

४४ टक्के मतदारांचे वय ३५ पेक्षा कमी

पाकिस्तान हा तरुणांचा देश आहे. या देशात विशीतील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. दुसरीकडे पाकिस्तामधील बरेच लोक असे आहेत की, ज्यांचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी आहे. मतदारांमध्ये साधारण ४४ टक्के मतदारांचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. म्हणजेच या निवडणुकीत तरुणांच्या मताला फार महत्त्व असणार आहे.

२६६ जागांसाठी निवडणूक

पाकिस्तानमध्ये एकूण २६६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मतदार २६६ जागांसाठी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला थेट मतदान करू शकतील. पाकिस्तानमध्ये द्विसदनी संसदीय प्रणाली आहे. या निवडणुकीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी नंतर कनिष्ठ सभागृहाचे सदस्य होतील. भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते, तो उमेदवार विजयी म्हणून घोषित केला जातो.

६० जागा महिला, तर १० जागा बिगरमुस्लिमांसाठी राखीव

पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहातील २६६ जागांपैकी ६० जागा या महिलांसाठी राखीव असतात; तर १० जागा या बिगरमुस्लिमांसाठी राखीव ठेवल्या जातात. राष्ट्रीय निवडणुकीतील कामगिरीनुसार या जागा वेगवेगळ्या पक्षांना देण्यात येतात.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानुसार एकूण ५,१२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हणजेच प्रत्येक मतदारसंघात सरासरी १९ उमेदवार उभे आहेत. त्यातील ४,८०६ म्हणजेच साधारण ९४ टक्के उमेदवार हे पुरुष; तर फक्त ३१२ उमेदवार या महिला आहेत. या निवडणुकीत दोन तृतीयपंथीदेखील उभे राहिले आहेत.