Shivaji Maharaj Rajyabhishek: छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारतासाठी आदरस्थानी आहेत. आपला देश परकीय सत्तेच्या पडछायेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला. इतकंच नाहीतर स्वराज्याचे अशक्य वाटणारे स्वप्न प्रत्यक्ष आकारास आणले. ६ जून १६७४ रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्याच पार्श्वभूमीवर ब्रिटिशांच्या नजरेतून हा सोहळा कसा होता याचा घेतलेला आढावा.
“शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला. १७ व्या शतकामध्ये जवळजवळ संपूर्ण भारतात एकही देशी सार्वभौम सत्ता अस्तित्त्वात नव्हती. दक्षिणेकडील साम्राज्य लोप पावल्यानंतर शाही राजवटींना समर्थपणे झुंज देऊ शकेल अशी कोणतीही सत्ता अस्तित्त्वात नव्हती. अशा परिस्थितीत शून्यातून स्वराज्य निर्माण करून केवळ शाही राजवटींनाच नव्हे तर दिल्लीतील प्रबळ सत्तेलाही त्यांनी आव्हान दिले. पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्य वखारवाले यांनाही नामोहरम केले आणि स्वतःचा राज्याभिषेक करून एक समर्थ सार्वभौम मराठा राज्य उदयास आणले. या घटनेमुळे शेकडो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतीय मनोवृत्तीला विलक्षण चेतना मिळाली. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात लावलेले हे स्वराज्याचे रोपटे पाहता पाहता बहरले, कालांतराने मोठे झाले, त्याचा वृक्ष होऊन त्या वृक्षाच्या अनेकविध फांद्या भारताच्या वेगवेगळ्या भागात पसरल्या आणि मराठी राज्याचे रूपांतर मराठा साम्राज्यात झाले. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास मध्ययुगीन भारताच्या इतिहासात राज्याभिषेकही सुवर्णाक्षरांनी नमूद करण्यासारखी आहे. एका वाक्यात सांगावयाचे झाले तर ‘शिवराज्याभिषेकामुळे नवे युग अवतरले.” (संदर्भ: छत्रपती शिवाजी महाराज: प्र. न. देशपांडे)
६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. भारताच्या इतिहासातील हा सोन्याचा क्षण होता. या दिवशी हजारो लोक या सोहळ्याला उपस्थित होते. परंतु, ब्रिटिशांच्या एका प्रत्यक्षदर्शी अधिकाऱ्याने या दिवसाच्या आधी आणि नंतर झालेल्या घटनांचे वर्णन आपल्या डायरीत केले आहे. त्यामुळे आपल्याला एका परकीय व्यक्तीने शिवराज्याभिषेकाविषयी काय लिहिले आहे, याविषयी समजण्यास मदत होते.
हेन्री ऑक्झिंडेन कोण होता?
सर हेन्री ऑक्झिंडेन हा ईस्ट इंडिया कंपनीचा बॉम्बे प्रांताचा इंग्रज डेप्युटी-गव्हर्नर होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभाला उपस्थित असलेला हा एकमेव ब्रिटिश नागरिक होता.

हेन्री ऑक्झिंडेन हा राज्याभिषेकाच्या आधी म्हणजे १३ मे रोजीच मुंबईहून रायगडावर जाण्यासाठी निघाला होता आणि राज्याभिषेकानंतर तो जवळपास एक आठवडा तिथेच होता. त्यामुळे या सोहळ्याच्या आधी आणि नंतर झालेल्या घटनांचा प्रत्यक्षदर्शी म्हणून त्याने लिहिलेल्या नोंदी महत्त्वाच्या ठरतात. हेन्री ऑक्झिंडेनने या कालखंडात घडलेल्या प्रत्येक घटनेची नोंद आपल्या डायरीत केली आहे. हेन्री ऑक्झिंडेन हा समुद्रमार्गे आला आणि रायगडावर पोहोचला. परंतु, पोहोचायला संध्याकाळ झाल्यामुळे त्याला गडावर प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्याला जवळच्याच चर्चचा आसरा घ्यावा लागला. या प्रसंगाचे वर्णन करताना तो लिहितो, “महाराजांचा दरारा प्रचंड होता. सुरक्षा यंत्रणाही दांडगी होती. त्यामुळे काळोख पडल्यावर कोणालाही गावात सोडले जात नसे.
हेन्री ऑक्झिंडेन हा रायगडावर का गेला होता?
हेन्री ऑक्झिंडेनच्या नोंदीत राज्याभिषेकाचे वर्णन असले तरी मात्र प्रत्यक्षात तो फक्त सोहळ्यासाठी आलेला नव्हता. मुंबईकर इंग्रजांना शिवाजी महाराजांशी राजकीय आणि व्यापारी संबंध अधिक दृढ करायचे होते, त्याच संदर्भात तो गेला होता.
१३ मे १६७४ रोजी हेन्री ऑक्झिंडेन लिहितो जॉर्ज रॉबिन्सन आणि थॉमस मायकल या माझ्या सहकाऱ्यांबरोबर निघून मी पोर्तुगाल चौल या ठिकाणी पोहोचलो. शिवाजी महाराजांच्या भीतीने या गावाच्या वेशी संध्याकाळी लगेचच बंद होतात. त्यामुळे ती रात्र सेंट सबेस्टीयन चर्चमध्ये काढावी लागली होती.
१९ मे रोजी हेन्री लिहितो आज आम्ही रायगडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावात आम्ही पोहोचलो. परंतु, शिवाजी महाराज भवानीच्या दर्शनासाठी प्रतापगडावर गेल्यामुळे आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला.
पुढे २२ मे रोजी हेन्री लिहितो आज आम्ही निराजी पंडितांची भेट घेतली. तेंव्हा आम्हाला समजले की, महाराज गडावर परत आले आहेत. महाराजांनी आमची गडावरच राहण्याची सोय केली होती. त्यानंतर आम्हाला किल्ला चढण्याची परवानगी मिळाली. दुपारी ३ वाजता आम्ही पाचड सोडले. तर सूर्यास्ताच्या वेळी आम्ही गडावर पोहोचलो.

हेन्रीने गडाचे वर्णन कसे केले आहे?
हेन्री रायगडाचे वर्णन भक्कम किल्ला असे करतो. गर्द हिरवळीने वेढलेल्या हा किल्ला कोणीतरी फितूर असल्याशिवाय काबीज करणे अशक्य असल्याचे वर्णन त्याने केले आहे. हेन्री म्हणतो गडावरील आमचे निवासस्थान महाराजांच्या निवासस्थानापासून १ मैल अंतरावर होते. २६ मे नीराजी पंडितांच्या मध्यस्थीने आम्ही राजांची भेट घेतली. राज्याभिषेक सोहळा आणि लग्न या सर्वात गुंतलेले असतानाही राजांनी आम्हाला भेट दिली. कंपनीला अपेक्षित असलेल्या व्यापारी मुद्द्यांवर चर्चा झाल्यावर महाराजांनी मोरोपंत यांच्याशी चर्चा करून तह पूर्ण करा, अशी असे सांगितले. ५ जून रोजी निराजी पंडितांनी माझ्यापर्यंत संदेश पाठवला की, उद्या राजे सिंहासनावर आरूढ होणार आहेत. आपण इथे स्वतःहून उपस्थित राहिल्यास त्यांना आनंदच होईल. म्हणून मी रित्या हाताने जाणे शोभणारे नसल्याने नजराणा तयार ठेवला. निराजी पंडितांना कळवले की, मी उपस्थित राहीन.

६ जूनच्या नोंदीत हेन्री लिहितो, या दिवशी राजा भव्य सिंहासनावर आरूढ झाले. संभाजी राजे, मोरोपंत पेशवे, एक श्रेष्ठ ब्राह्मण सिंहासनाखाली ओट्यावर बसले होते. मराठा सरदारांनी उंची पोशाख परिधान केले होते. महाराजांची १६ हजार होन वापरून तुला करण्यात आली होती. त्यात काही १००० होन वापरून त्यांचे वाटप ब्राहमणांमध्ये करण्यात येणार आहे. मी काही अंतरावरून महाराजांना मुजरा केला. नारायण शेणवी या दुभाषाने आमच्या वतीने हिऱ्याची अंगठी नजराणा म्हणून दिली. महाराजांनी आमच्याकडे पाहिले आणि सिंहासनाजवळ येण्यास सांगितले.

महाराजांच्या सिंहासनाचे वर्णन करताना हेन्री लिहितो, ‘सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक आणि राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला दोन मोठ्या दाताच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे आणि एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीवर असलेली सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती.’ या शुभचिन्हांचा अनेक प्रकारे अर्थ लावण्याचा प्रयत्न इतिहासकारांनी केलेला आढळतो. साधारणपणे असे मानले जाते की मत्स्यचिन्ह हे समुद्रवर्चस्वाचे प्रतीक आहे. अश्वपुच्छ हे सर्वांगसज्ज अशा अश्वदलाचे प्रतीक आहे आणि तराजू हे निःपक्षपाती न्यायव्यवस्थेचे प्रतीक आहे. या ३ प्रतिकांवरून शिवाजी महाराजांचे सामर्थ्य तर स्पष्ट होतेच पण त्याचबरोबर जनतेला न्याय देण्यासाठी आपण सिंहासनरूढ आहोत याची जाणीवही शिवाजी महाराजांनी तराजूच्या चिन्हाद्वारे करून दिली, असे हेन्री राजांबद्दल लिहितो.
हेन्री लिहितो, राजवाड्याच्या मुख्य प्रवेशापाशी दोन हत्ती आणि दोन पांढरे घोडे होते. इतक्या उंचावर हे प्राणी आणले कसे याबद्दल हेन्री आश्चर्य व्यक्त करतो.
हेन्री ऑक्झिंडेनच्या नजरेतून पाहिलेला शिवराज्याभिषेक केवळ एक राजकीय घटना नव्हती, तर तो संपूर्ण भारताच्या भविष्यासाठीचा एक निर्णायक क्षण होता. एका परकीय अधिकाऱ्याने लिहिलेल्या या तपशीलवार नोंदींमुळे आपल्याला त्या ऐतिहासिक घटनेचे वास्तवदर्शी चित्र घडते. राजाश्रय, प्रशासन, सुरक्षितता, न्यायव्यवस्था आणि प्रतिकात्मकता यांची सांगड घालून शिवाजी महाराजांनी जी व्यवस्था उभी केली, ती इंग्रज अधिकाऱ्यालाही थक्क करणारी होती. शिवराज्याभिषेक हा भारतातील स्वराज्य, स्वाभिमान आणि न्यायसंस्थेचा पाया रचणारा सोहळा होता आणि हेन्री ऑक्झिंडेनच्या नोंदी या त्याचा जिवंत पुरावा आहेत.