Story of ‘rat temple’ near Bikaner visited by PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२४ मे) राजस्थानमधील बिकानेरपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या देशनोक गावातील करणी माता मंदिराला भेट दिली. उंदरांचं मंदिर म्हणून ओळखलं जाणारं हे ऐतिहासिक मंदिर लाखो उंदरांचे (काबा) निवासस्थान मानलं जातं आणि हे उंदीर पवित्र मानले जातात व त्यांचं संरक्षण केलं जातं.
करणी माता कोण होत्या?
करणी माता देवीला ऋद्धी कंवर किंवा ऋधू बाई म्हणूनही ओळखलं जातं. त्या १४ व्या-१५ व्या शतकातील संत होत्या. त्यांना देवी दुर्गेचा अवतार मानलं जातं. त्यांचा जन्म इ.स. १३८७ साली फालोदीजवळील सूप गावात चारण कुटुंबात झाला होता (चारण हे परंपरेने दरबारी कवी आणि वंशावळ सांगणारे होते). असं म्हटलं जातं की, ऋद्धी कंवर २१ महिन्यांपर्यंत आईच्या गर्भात होत्या आणि त्यांच्या आगमनाची पूर्वसूचना त्यांच्या आईला देवी दुर्गेने स्वप्नात दिली होती. लहानपणी अनेक चमत्कार केल्यानंतर त्यांना करणी माता हे नाव मिळालं. करणी मातेचे जीवनाविषयक ऐतिहासिक तपशील अत्यल्प आहेत. त्यांच्याबद्दलची माहिती मुख्यतः मौखिक परंपरा आणि ‘करणी माता चरित्र’ यांसारख्या भक्ती ग्रंथांतून मिळते. त्यांनी राव जोधा (जोधपूरचे संस्थापक) आणि राव बीका (बीकानेरचे संस्थापक) यांसारख्या राजांना मदत केल्याचं सांगितलं जातं. असं मानलं जातं की, जोधपूर आणि बीकानेर अनुक्रमे १४५९ आणि १४८८ मध्ये करणी मातेच्या आशीर्वादाने स्थापन झाले. अनुयायांचं म्हणणं आहे की, करणी माता १५१ वर्षे जिवंत होत्या आणि १५३८ साली त्यांनी स्वेच्छेने देहत्याग केला.
करणी माता आयुष्यभर अविवाहित होत्या असे काही भक्त मानतात. एका कथेनुसार त्यांनी आपल्या वराला घाबरवण्यासाठी सिंहाचे रूप घेतले आणि तो वर नंतर त्यांच्या धाकट्या बहिणीशी लग्न करून मोकळा झाला, असं प्रा. लिंडसे हार्लन यांनी Religion and Rajput Women: The Ethic of Protection in Contemporary Narratives (1992) मध्ये नमूद केलं आहे. करणी माता मंदिराचं आजचं बांधकाम बीकानेरचे महाराजा गंगा सिंग यांनी २० व्या शतकाच्या सुरुवातीला केलं.

चारण व इतर जातींमध्ये करणी मातेचं महत्त्व काय आहे?
चारण समाज त्यांना केवळ देवी म्हणून नव्हे, तर कुलदेवी मानतो. मंदिरातील पुजारी परंपरेने चारणच असतात आणि ते स्वतःला करणी मातेचे वंशज मानतात. करणी माता यांना राजस्थानमधील प्रमुख क्षत्रिय जात म्हणजे राठोड राजपूत देखील अत्यंत श्रद्धेने पूजतात. राव जोधा आणि राव बीका या राठोड राजांना दिलेल्या आशीर्वादामुळे अनेक राजपूत वंशांनी करणी मातेला आपल्या राजघराण्याची रक्षणकर्ती देवी मानलं आहे. प्रा. हार्लन यांनी म्हटले आहे की, करणी माता यांसारख्या कुलदेवी लोकप्रथा आणि राजघराण्यातील वैधतेचा संगम दर्शवतात.
भारत-पाक फाळणीदरम्यान बलुचिस्तानमध्ये गेलेलं हिंगलाज माता मंदिर भारताबाहेर गेल्यानंतर करणी मातेच्या पूजेचं महत्त्व भारतात अधिक वाढलं आहे. करणी सेनेलाही आपलं नाव करणी मातेकडूनच मिळालं आहे. ही संघटना २००६ साली स्थापन झाली होती. करणी माता यांना मेघवाल, माळी यांसारख्या इतर जातीही पूजतात. करणी मातेच्या चमत्कारी व न्यायप्रिय स्वभावामुळे त्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन पूजल्या जातात. मंदिर सर्व भक्तांसाठी खुलं आहे.
मंदिरात उंदरांची पूजा का केली जाते?
स्थानिक भाषेत ‘काबा’ म्हणून ओळखले जाणारे हे उंदीर करणी मातेच्या कुटुंबातील व्यक्तींचे पुनर्जन्म मानले जातात. दंतकथेप्रमाणे, करणी मातेचा सावत्र मुलगा लक्ष्मण (लखन) पाण्यात बुडाला तेव्हा करणी मातेने त्याला पुन्हा जिवंत करण्याची यमाकडे विनंती केली. यमाने संमती दिली आणि लक्ष्मण व त्यांच्या इतर वंशजांना उंदराच्या रूपात पुनर्जन्म घेण्याची परवानगी दिली. दुसऱ्या कथेनुसार, जेव्हा यमाने नकार दिला, तेव्हा करणी मातेने स्वतःच लक्ष्मणाला जिवंत केलं आणि आपल्या वंशजांना उंदराच्या रूपात पुनर्जन्म घेण्याचे आदेश दिले. आजही या मंदिराजवळ राहणाऱ्या अनेक कुटुंबांचा दावा आहे की, ते करणी मातेचे वंशज आहेत. या श्रद्धेमुळे उंदीर पवित्र मानले जातात.

असं मानलं जातं की, हे उंदीर पुढे माणसाच्या रूपात जन्म घेतील. या उंदरांबाबत अनेक श्रद्धा आहेत. इतक्या उंदरांच्या उपस्थितीतही कोणताही रोग पसरलेला नाही; त्यांच्या संख्येत फारसा बदल झालेला नाही; त्यांच्या मृत्यूच्या वेळी दुर्गंधी येत नाही; आणि ते मंदिराच्या बाहेर जात नाहीत. उंदरांनी स्पर्श केलेला प्रसाद देखील पवित्र मानला जातो आणि त्याने आजार बरे होतात, असं भक्त मानतात. विशेषतः पांढरा उंदीर दिसणं शुभ मानलं जातं.
शस्त्रदलांसाठी मंदिराचे महत्त्व काय आहे?
पाकिस्तान सीमेवर असलेल्या जिल्ह्यात हे मंदिर शस्त्रदलांसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हे नातं फाळणीपूर्व काळापासूनच सुरू आहे. सेवानिवृत्त कर्नल महेंद्रसिंह चंडेल (विशिष्ट सेवा पदक प्राप्त) यांनी सांगितलं की, करणी माता बीकानेरच्या सैनिकी तुकड्यांची देवी होती. करणी बटालियन, सदुल इन्फन्ट्री, डुंगर लान्सर्स, विजय बॅटरी आणि गंगा रिसाला अशी या सैनिकी तुकड्यांची नावं आहेत. यातील सदुल इन्फन्ट्री आणि करणी बटालियन एकत्र होऊन १९ राजपूत बटालियन झाली, तर विजय बॅटरी ४१ फील्ड रेजिमेंट आर्टिलरीमध्ये विलीन झाली. आजही त्यांना अनुक्रमे १९ राजपूत करणी बटालियन आणि ४१ फील्ड करणी रेजिमेंट म्हणून ओळखलं जातं. परंपरेनुसार, जेव्हा एखादा नवा कमांडर ऑफिसर पदभार स्वीकारतो, तेव्हा तो मंदिराला भेट देतो. नवरात्री दरम्यान दोन कनिष्ठ अधिकारी मंदिरात जाऊन बटालियनच्या वतीने विशेष अर्पण करतात. करणी माता हे दिव्य स्त्रीशक्तीचं प्रतीक मानलं जातं. विशेषतः राजस्थानातून भरती झालेल्या सैनिकांमध्ये त्यांचं महत्त्व खूप आहे. अशा सैनिकांकडून फिल्ड ड्युटीवर जाण्यापूर्वी गणवेशात मंदिरात जाऊन प्रार्थना करणं आणि आशीर्वाद घेणं सामान्य गोष्ट आहे.