ऑपरेशन सिंदूरच्या काही महिन्यांनंतरच भारत सरकारकडून ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही ऑपरेशनची नावे जवळजवळ एकसारखी असल्याने लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली होती. मात्र, इराण-इस्रायल संघर्षादरम्यान भारताने ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. ही नवी मोहीम नक्की काय आहे? त्यामागील नेमका उद्देश काय? या मोहिमेला ऑपरेशन सिंधू असे नाव का देण्यात आले आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.
ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन सिंधूमधील फरक काय?
- ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यासाठी सुरू करण्यात आले होते.
- इराणवर इस्रायली-अमेरिकन लष्करी हल्ल्याने भीती वाढली आहे.
- वाढत्या भीतीमुळे इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी १८ जून रोजी भारत सरकारकडून ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आले आहे.
- या मोहिमे अंतर्गत ११० विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान दिल्लीत उतरले आहे.
ऑपरेशन सिंधू सुरू करण्यामागील उद्देश काय?
१३ जून रोजी इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. इस्रायल-इराण संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालला आहे, त्यामुळे तिथे अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेची चिंता वाढली आहे. वाढती अस्थिरता बघता, परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वी नागरिकांना त्वरित बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून इराणच्या संघर्षग्रस्त भागात राहणारे भारतीय विद्यार्थी, व्यावसायिक,पर्यटक आणि इतरांना देशात परत आणण्यात येत आहे.

११० भारतीय विद्यार्थ्यांच्या पहिल्या गटाला सुखरूप भारतात आणण्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी गुरुवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. या विद्यार्थ्यांमधील ९० जण जम्मू आणि काश्मीरचे आहेत. वृत्तानुसार, १३,००० हून अधिक भारतीय विद्यार्थी सध्या इराणमध्ये आहेत. त्यातील बहुतेक विद्यार्थी इराणमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याकरिता गेले होते. जास्तीत जास्त भारतीयांना इराणमधून बाहेर काढण्यासाठी तुर्कमेनिस्तानमार्गे उड्डाणे नियोजित करण्यात आली आहेत. या संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाचे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे.
ऑपरेशनला ‘सिंधू’ असे नाव का देण्यात आले?
नावाच्या बाबतीत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. परंतु, ऐतिहासिकदृष्ट्या सिंधूला नदी म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये ‘सिंधू’चा अर्थ ‘नदी’ किंवा ‘महासागर’ असा होतो. तसेच, सिंधू भारतीय उपखंडातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. या नावाचे आणखी एक ऐतिहासिक महत्त्व म्हणजे भारताचे नाव सिंधूवरून पडले असल्याचे म्हटले जाते. पर्शियन लोकांनी ‘सिंधू’ चा उच्चार हिंदू असा केला, अखेर ग्रीक आणि लॅटिन भाषेत हा उच्चार भारत असा झाला. पर्शियन भाषेत ‘स’ चा उच्चार ‘ह’ असा केला जातो. त्यामुळे त्यांनी ‘सिंधू’ ला ‘हिंदू’ म्हटले. ‘सिंधू’ शब्दावरुन ‘हिंदू’ आणि त्यानंतर ‘इंडिया’ असा भारतासाठीचा उच्चार आणि नाव रूढ झाले. या ऑपरेशनचे ‘सिंधू’ हे नाव आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी भारताच्या वचनबद्धतेचेही प्रतीक असू शकते.
ऑपरेशन सिंधू कसे राबवविले जात आहे?
इराणमधील अडकलेल्या भारतीयांना उत्तर इराण (उदा. उर्मिया) पासून आर्मेनियापर्यंत रस्ते मार्गाद्वारे आणले जात आहे. त्यानंतर येरेवन ते नवी दिल्लीपर्यंत चार्टर्ड विमानांनी त्यांना देशात आणले जात आहे. या मोहिमेत भारतीय हवाई दल आणि इंडिगोसारख्या व्यावसायिक विमान कंपन्या मिळून काम करत आहेत आणि इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील २४×७ दूतावास हेल्पलाइन आणि संकट-नियंत्रण केंद्रे आहेत. भारतीय रहिवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी सरकार आर्मेनियन, इराणी आणि तुर्कमेन अधिकाऱ्यांशीदेखील समन्वय साधत आहे.
११० विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान दिल्लीत उतरल्यानंतर जम्मू काश्मीर विद्यार्थी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय एस जयशंकर यांचे ऑपरेशन सिंधू सुरू केल्याबद्दल आभार मानले. इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध भडकण्याची महिती आहे, त्यामुळे युद्धपातळीवर काम करून इराणमधील भारतीयांना देशात परत आणले जात आहे.
पालकांनी मानले आभार
इराणमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थी माझ हैदर याचे वडील हैदर अली म्हणाले, “आम्ही खूप आनंदी आहोत. विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या घरी परत आणण्यात आले आहे. त्यासाठी आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. पण, जे विद्यार्थी तेहरानमध्ये अडकले आहेत त्यांना अद्याप बाहेर काढण्यात आले नाही, त्यांच्यासाठी आम्ही दु:खी आहोत,” असे त्यांनी ‘पीटीआय’शी बोलताना म्हटले.
बुलंदशहर येथील रहिवासी परवेझ आलम आपल्या मुलाची विमानतळावर प्रतीक्षा करत होते. त्यावेळी त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, “गेल्या दोन वर्षांपासून माझा मुलगा उर्मिया येथे शिक्षण घेत आहे. सर्वकाही ठीक होते, पण सध्या परिस्थिती बिघडली आहे. आम्ही खूप तणावात होतो. पण, भारत सरकारने विद्यार्थ्यांना आर्मेनिया येथे नेले आणि तेथे त्यांना चांगल्या हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले. आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत.” विद्यार्थी मीर खालिफ याने इराणमधील तणावाच्या स्थितीबद्दल माहिती दिली. तो म्हणाला, “आम्हाला क्षेपणास्त्रे दिसत होती. तेथे युद्ध सुरू होते. आमच्या परिसरातदेखील बॉम्बस्फोट झाला. आम्हाला परिस्थितीची खूप भीती वाटत होती. मला आशा आहे की आम्हाला ते दिवस पुन्हा पहावे लागणार नाहीत.”