प्रवाशांना वाहतूक कोंडीमध्ये तिष्ठत राहावे लागू नये, इच्छित स्थळी झटपट पोहोचता यावे या उद्देशाने बाइक टॅक्सीचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. पारंपरिक टॅक्सीच्या धर्तीवरच चारचाकीऐवजी दुचाकीचा वापर या सेवेसाठी करण्यात येत आहे. मोटारसायकल अथवा स्कूटरवरून प्रवाशांना ईप्सित स्थळी सोडण्यात येते. बाइक टॅक्सीची सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरू लागली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बाइक टॅक्सीचा वापर वाढत आहे. बाइक टॅक्सीसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे, मात्र तिला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही राजरोसपणे ही सेवा सुरू आहे. दरम्यान, महिलांची सुरक्षितता, पर्यावरणावर होणारे परिणाम, रिक्षा-टॅक्सी चालकांचा बुडणारा रोजगार आदी विविध कारणांमुळे बाइक टॅक्सीला विरोधही होऊ लागला आहे. बाइकटॅक्सी विषयी घेतलेला हा आढावा…

बाइक टॅक्सीचे फायदे काय?

बाइक टॅक्सीवरून चालकासोबत एक प्रवाशाला प्रवास करता येते. मोठ्या शहरांमध्ये कायम वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणी बाइक टॅक्सीने प्रवास करणे सोईस्कर ठरत आहे. बाइक टॅक्सीमुळे जलद आणि तुलनेत कमी खर्चात प्रवास होतो. ही सेवा कमी अंतराच्या प्रवासासाठी उपयुक्त असून शेवटच्या टप्प्याचा उत्तम पर्याय म्हणून बाइक टॅक्सीकडे पाहिले जाते. खासगी ॲपद्वारे बाइक टॅक्सीचे आरक्षण करता येते.

बाइक टॅक्सीला कोणता रंग अनिवार्य?

बाइक टॅक्स’ला चिन्हांकित करण्यासाठी पिवळ्या रंगाचे वाहन अनिवार्य आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाइक टॅक्सी चालकांना प्रत्येक प्रवासासाठी स्वच्छ आणि पिवळ्या रंगाचे हेल्मेट प्रदान करणे बंधनकारक आहे.

महिला प्रवाशांसाठी कोणती विशेष सुविधा?

बाइक टॅक्सीमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. महिला प्रवाशांना महिला चालक निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. यामुळे बाइक टॅक्सीतून महिलांना रोजगाराची संधी मिळू शकेल. महिला चालकांची संपर्क माहिती प्रसारित करण्यास मनाई असेल.

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणत्या तरतुदी?

महाराष्ट्र परिवहन विभागाने प्रवासी आणि चालकांची सुरक्षितता, सुविधा व हक्क सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. याव्यतिरिक्त दुचाकीस्वार आणि चालक यांच्यामध्ये विभाजक असावे, पावसाळ्यात संरक्षक कवच आणि जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बंधनकारक केली आहे. तसेच, मुसळधार पाऊस किंवा वादळासारख्या परिस्थितीत बाइक टॅक्सी सेवा स्थगित करण्याचा दंडक नियमात घातला आहे. नवीन धोरणात बाइक टॅक्सीसाठी कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. त्यात प्रवासी पात्रता, सुरक्षा मानांकन, भाडे नियम आणि उल्लंघनाची जबाबदारी आदींचा समावेश आहे. तसेच याबाबत नागरिकांकडून सूचना – हरकती मागविण्यात आल्या होत्या. यासंदर्भात अनेक नागरिकांनी मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयात विविध उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत.

तरीही बाइक टॅक्सीला विरोध का?

बाइक टॅक्सीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीला अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. भविष्यात बाइक टॅक्सीवर कोणतेही नियंत्रण नसेल. नोंदणी न केलेल्यांनाही अनधिकृतपणे बाइक टॅक्सी चालवता येईल. त्यांच्यावर कोणाचा वचक नसेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील काही भागत आजही परवानगी नसताना बाइक टॅक्सी धावत आहेत. पर्यायी वाहतूक सेवा सुरू होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. उलटपक्षी राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवेवर भर देणे आवश्यक आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध असताना बाइक टॅक्सी कशाला हवी असाही मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. ॲपआधारित टॅक्सीवर कोणाचेही नियंत्रण नाही. सर्वाधिक अपघात दुचाकीचे होतात. प्रवासाच्या दृष्टीने बाइक टॅक्सी असुरक्षित ठरू शकेल. त्यामुळे बाइक टॅक्सीला विरोध वाढू लागला आहे.

परवानगी नसताना बाइक टॅक्सी सुरू

बाइक टॅक्सीच्या नियमावलीला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मात्र, त्याआधीच ॲपआधारित वाहतूक कंपन्यांनी मुंबईत ही सेवा सुरू केली आहे. परंतु, यात सुरक्षा मानकांचे उल्लंघन होत असून परिवहन विभागाने याबाबत ठोस पावले उचललेली नाहीत. सध्या पेट्रोल बाइक टॅक्सीच्या माध्यमातून अनधिकृतपणे सेवा सुरू आहे. त्यामुळे नियमावलीस मंजुरी मिळाल्यानंतर तिचे पालन होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

रिक्षा चालकांना स्पर्धा

स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली बाइक टॅक्सी सुरू केल्याने सध्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर परिणाम होईल. तसेच ऑटोरिक्षा, टॅक्सीची मागणी कमी होऊन, त्यांच्या उत्पन्नात घट होईल. बाइक टॅक्सीचा वापर वाढल्यास, रिक्षा, टॅक्सी वापर करणाऱ्यांच्या संख्येत घट होईल. परिणामी, राज्यातील १५ लाखांहून अधिक ऑटोरिक्षा चालकांचा रोजगार बुडण्याची चिन्हे आहेत.

नियम धाब्यावर बसवले जातील?

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही दुचाकीस्वारांची आहे. हेल्मेट न घालणे, सिग्नलचे नियम मोडणे, मार्गिका बदलणे आदी नियमभंग दुचाकीस्वार करतात. बाइक टॅक्सीसाठी हेल्मेटसक्तीची करण्यात आली आहे. मात्र सध्या धावत असलेल्या अनेक बाइक टॅक्सीचे चालक प्रवाशांना हेल्मेट देत नसल्याने निदर्शनास आले आहे. रस्त्यावरून बाइक टॅक्सी धावताना नियमांचे पालन करण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहतूक नियम धाब्यावर बसवून बाइक टॅक्सी चालविल्यास अपघातांना आमंत्रण मिळेल.

तोटे काय आहेत?

चारचाकीच्या तुलनेत दुचाकीच्या अपघाताचा धोका जास्त असतो. पावसाळ्यात किंवा खराब हवामानात बाइक टॅक्सीचा प्रवास धोकादायक होऊ शकतो. तसेच प्रवाशांसाठी देण्यात येणाऱ्या हेल्मेटची गुणवत्ता आणि स्वच्छतेची हमी नसते. दूरवरच्या प्रवासासाठी बाइक टॅक्सी आरामदायक सेवा नाही. तसेच बॅग किंवा इतर सामान घेऊन बाइकवरून प्रवास करणे कठीण आहे. वयोवृद्ध, अपंग किंवा शारीरिक व्याधी असलेल्या प्रवाशांसाठी बाइक टॅक्सी उपयुक्त नाही. महिला प्रवाशांना अनोळखी चालकासोबत प्रवास करताना असुरक्षित वाटू शकते. चालकाची योग्य पडताळणी न झाल्यास गैरवर्तनाची शक्यता आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक टॅक्सी प्रदूषणास कारणीभूत ठरू शकतात. ई-बाइक असल्यास प्रदूषणाचा धोका कमी होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवास किती अंतराचा अपेक्षित?

बाइक टॅक्सीच्या प्रत्येक फेरीमध्ये फक्त एकाच प्रवाशाला मागे बसण्यास परवानगी आहे. बाइक टॅक्सीवरून १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवास करण्यास सक्त मनाई आहे. बाइक टॅक्सीचे प्रवास अंतर १५ किमीपेक्षा जास्त नसावे, वेग ताशी ६० किमी असावा. प्रवास सुरू करण्यापूर्वी ॲप किंवा इतर माध्यमांद्वारे भाडे स्पष्टपणे कळवणे अनिवार्य करण्यात येईल. प्रादेशिक किंवा राज्य वाहतूक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा ते जास्त असू नये. अपघाती मृत्यू झाल्यास चालक आणि प्रवाशासाठी किमान दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण सुनिश्चित करावे. याव्यतिरिक्त, सर्व चालकांसाठी नियमित सुरक्षा प्रशिक्षण आणि वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य असेल.