काही काळापासून मुलं जन्माला घालण्याचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही जोडपी केवळ एकच मूल जन्माला घालण्याचा पर्याय निवडत आहेत; तर काही मुलं जन्मालाच न घालण्याचा पर्याय निवडत आहेत. यांसारख्याच परिस्थितीविषयी सांगताना बिंगहॅम्टन विद्यापीठातील मानववंशशास्त्राचे प्राध्यापक मायकेल ए. लिटील यांनी भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, खूप कमी लोक १०० वर्षांपेक्षा जास्त काळ जगतात. त्यामुळे जर आता कोणालाही मुले झाली नाहीत, तर कदाचित १०० वर्षांत पृथ्वीवर माणसं उरणार नाहीत. ही घट हळूहळू होईल, असे त्यांनी म्हटले.

आवश्यक कामे करण्यासाठी पुरेसे तरुण नसतील आणि त्यामुळे जगभरातील समाज विखुरला जाईल. मग साहजिकच त्याचा परिणाम अन्न उत्पादन करण्याच्या, आरोग्य सेवा पुरविण्याच्या आणि आपण ज्यावर अवलंबून आहोत अशा सर्व बाबींवर होईल. मानववंशशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी मानवी वर्तन, जीवशास्त्र व संस्कृतींचा अभ्यास केला आहे. ते म्हणाले की, ही परिस्थिती फार आनंददायी नाही. या परिस्थितीमुळे आपली संस्कृतीच राहणार नाही. खरंच माणसं नामशेष होऊ शकतात का? सध्याची परिस्थिती काय आहे? तज्ज्ञांनी अशी भीती का वर्तवली आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.

जगातील लोकसंख्या अजूनही वाढत आहे; मात्र त्या वाढीचा वेग मंदावला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

जागतिक आपत्ती आल्याशिवाय जन्मदरात अचानक लक्षणीय घट होणे अशक्य आहे. लेखक कर्ट व्होनेगुट यांनी त्यांच्या ‘गॅलापागोस’ या कादंबरीत काही संभाव्य परिस्थितीविषयी सांगितले आहे. संसर्गजन्य रोगांमुळे लोकांना वंध्यत्व येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे लोक मुले जन्माला घालण्यास सक्षम राहणार नाहीत. आणखी एक शक्यता म्हणजे अणुयुद्ध ज्यामध्ये कोणीही जिवंत राहणार नाही. त्यांनी अशीही शक्यता वर्तवली की, लोक पूर्वीप्रमाणे सहजपणे बाळ जन्माला घालू शकणार नाहीत. अशा विविध शक्यता त्यांनी वर्तवल्या आहेत.

लोकसंख्या पोहोचणार १० अब्जांपर्यंत

जगातील लोकसंख्या अजूनही वाढत आहे; मात्र त्या वाढीचा वेग मंदावला आहे. लोकसंख्या बदलांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचा अंदाज आहे की, २०८० पर्यंत एकूण लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोहोचेल. ही संख्या आज आठ अब्ज आहे. १९७४ मध्ये ही लोकसंख्या चार अब्ज होती. अमेरिकेची लोकसंख्या सध्या ३४२ दशलक्ष आहे. १९३० च्या दशकात मी जन्मलो तेव्हाच्या लोकसंख्येपेक्षा ही लोकसंख्या सुमारे २० कोटींनी जास्त आहे, असे त्यांनी म्हटले. परंतु, जगभरात आणि अमेरिकेतही जन्मापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडल्यास ही संख्या हळूहळू कमी होऊ शकते. २०२४ मध्ये अमेरिकेत सुमारे ३.६ दशलक्ष बाळांचा जन्म झाला, जो २००४ मध्ये ४.१ दशलक्ष होता. दरम्यान, २०२२ मध्ये सुमारे ३.३ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला, जो २० वर्षांपूर्वी २.४ दशलक्ष होता.

या पद्धतींमध्ये एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तरुण व वृद्ध लोकांमधील योग्य संतुलन. तरुण समाजासाठी ते खूप महत्त्वाचे आहे. नवीन कल्पना अमलात आणण्याचे आणि आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या उत्पादनाचे काम तरुणांच्याच हातात असते. तसेच, अनेक वृद्धांना अन्न आणि कपडे यांसारख्या मूलभूत कामांसाठी तरुणांच्या मदतीची आवश्यकता भासते.

घटता प्रजनन दर

  • अनेक देशांमध्ये प्रजनन दर घटला आहे.
  • भारत आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांमध्ये ही घट सर्वांत तीव्र आहे.
  • अनेक जोडपी आजकाल मुले जन्माला न घालण्याचा पर्याय निवडत आहेत आणि त्यामुळे जन्मदरात घट होत असल्याचे दिसून येत आहे.
  • अशा प्रकारची लोकसंख्या घट इतर देशांमधून स्थलांतरित होऊन आटोक्यात ठेवता येते; परंतु सांस्कृतिक आणि राजकीय बाबींमुळे ती गोष्ट शक्य होत नाही.
  • तसेच, प्रजनन समस्या वाढल्याने अनेक पुरुषांची मुलांना जन्म देण्याची क्षमता कमी होत आहे. जर ही परिस्थिती आणखी बिकट झाली, तर त्यामुळे लोकसंख्येत मोठी घट होऊ शकते.

माणसं नामशेष होतील का?

माणसांची प्रजाती होमो सेपियन्स किमान २,००,००० वर्षांपासून अस्तित्वात आहे. हा खूप मोठा काळ आहे. परंतु, पृथ्वीवरील सर्व प्राण्यांप्रमाणे मानव प्रजातीलाही नामशेष होण्याचा धोका आहे. होमो सेपियन्सचे जवळचे नातेवाईक असलेल्या निअँडरथल्सचे नातलग ४०,००० वर्षांपूर्वी नामशेष झाले होते. काही शास्त्रज्ञांना असे पुरावे सापडले आहेत की, होमो सेपियन्स त्यांच्या कुटुंबांना अन्न पुरवण्यात आणि निअँडरथल्सपेक्षा जास्त मुले जन्माला घालण्यात अधिक यशस्वी झाल्याने त्यांची संख्या वाढली. जर माणसं नामशेष झाली, तर पृथ्वीवरील इतर प्राण्यांना भरभराटीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. दुसरीकडे माणसे नामशेष होणे दुःखद असेल. कारण- आपण मानवाने मिळवलेल्या कला आणि विज्ञानासह सर्व गोष्टी गमावून बसू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मायकेल ए. लिटील म्हणाले की, आपल्या स्वतःच्या ग्रहावर आपले भविष्य आहे, याची खात्री करून घेण्यासाठी आपल्याला काही पावले उचलण्याची गरज आहे. त्यामध्ये हवामान बदल नियंत्रित करणे आणि युद्धे टाळणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. तसेच, आपल्याला हे सत्य समजून घेणे आवश्यक आहे की, या ग्रहावर विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती असल्यानेच आपल्या प्रजातींसह सर्व प्राणी निरोगी राहू शकतात.