कोल्हापूर : आशिष शेलार यांची अवस्था ‘पिंजरा’ सिनेमातील मास्तर सारखी झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदासाठी शरद पवार यांचे पाय चाटण्यासाठी कोण गेले होते? अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप नेते अशिष शेलार यांच्यावर पलटवार केला आहे.

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या शेतकरी कायद्याचे महत्त्व समजून सांगण्यासाठी भाजपच्या वतीने प्रचार यात्रेचे आयोजन केले आहे. याची सुरुवात करताना आशिष शेलार यांनी ‘विधान परिषदेसाठी राजू शेट्टी यांच्यावर दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे,’ अशी टीका केली होती.

त्याला उत्तर देताना शेट्टी यांनी शेलार यांच्यावर टीकेची तोफ डागली. शेट्टी म्हणाले, सत्तासुंदरी हातातून गेल्याने शेलार यांच्यासह भाजपच्या नेत्यांची अवस्था भ्रमिष्टासारखा झाली आहे. भाजपच्या नेत्यांना ध्यानीमनी केवळ सत्ताच दिसत आहे. कृषी कायद्यावरून आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढा देत आहोत. तर ते अदानी-अंबानीच्या हितासाठी लढा देत आहेत.