वारणाकाठचा थरार

कोल्हापूर : नेहमीच्या शिरस्त्यानुसार महेशने बैल नदीपात्रात सोडले. बैलांना पाणी पाजले, न्हाऊ घातले. बैल परतू लागले. तोच चारपाच मगरींनी बैल आणि महेशवर हल्ला चढवला. अशावेळी बैलाने झुंज देत मगरींच्या हल्लय़ाला प्रतिकार केला आणि स्वत:सह मालकाचेही प्राण वाचवले. जिवावर आलेले संकट दूर करणारा ही थरारक घटना शुक्रवारी वारणा काठी घडली.

पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे महेश सर्जेराव काटे (वय २४) यांचे शेत आहे. वारणा नदीकाठी असलेल्या शेतामध्ये महेश व अन्य शेतकरी काम करीत होते. दुपारच्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी महेश यांनी चार बैल पात्रात नेले. बैलांना पाणी पाजले. अंगावर पाणी ओतून न्हाऊ घातले. त्यातील तीन बैल शेतात परतले.

एका बैलाला पाणी पाजले जात असताना तीन मगरींनी महेश यांना तर एका मगरीने बैलावर हल्ला चढवला. एका मगरीने महेश यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला. मगरीचे तीन दात हाडात आतमध्ये घुसले होते. प्रसंग जिवावर बेतलेला होता. पण याच वेळी बैलाने झुंजार वृत्ती दाखवली. त्यांने प्राणपणाने झुंजत प्रतिकार केला. हल्ला करणाऱ्या मगरींना परतावून लावले आणि आपल्यासह मालकाचाही जीव वाचवला. या घटनेनंतर महेश हे जखमी झाले असून त्यांच्यावर वारणा-कोडोली येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी आले होते. बैलाने मालकाचे प्राण वाचल्याने या बैलाची वारणा परिसरात समाज माध्यमात कौतुकाने चर्चा सुरू होती.