शासनाने लव्ह जिहाद आणि धर्मांतरा विरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी समस्त हिंदू समाजाच्यावतीने इचलकरंजीत रविवारी निघालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरुण, तरुणी यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देशातील विविध भागासह हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचा निषेध करण्यासाठी तसेच देशभरात लव्ह जिहाद प्रकारामुळे हिंदूमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून या विरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी सायंकाळी मोर्चा निघाला. राजर्षी शाहु महाराज पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला. भगवी टोपी, फेटे परिधान केलेले हजारो नागरिक,हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी मोर्चात घोषणा देत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत केले जात होते. हा मोर्चा गांधी पुतळ्याजवळ पोहचल्यावर लव्ह जिहादचे अभ्यासक आ शुतोष झा आणि बजरंग दलाचे नितीन महाजन यांनी धर्माचा अभ्यास जाणीवपूर्वक केला पाहिजे. त्याचा अभाव असल्याने लव्ह जिहाद सारखे विघातक प्रकार घडत आहेत. आईवडिलांनी मुलांवर सुसंस्कार केले पाहिजेत, असे मार्गदर्शन केले.