कोल्हापूर : महायुतीतील शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराज आणि छत्रपतींच्या गादीबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. मंडलिकांचे विधान म्हणजे छत्रपतींच्या गादीचा अवमान असल्याच्या प्रतिक्रिया इतिहास संशोधक, अभ्यासक यांनी व्यक्त केल्या. त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

इतिहास संशोधक रमेश जाधव म्हणाले की, मंडलिक यांचे हे वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. समाज परंपरेत मातृसत्ताक आणि पितृसत्ताक अशा पद्धती आहेत. सध्याचे शाहू महाराज हे राजर्षी शाहू महाराजांचे मुलींच्या बाजूने विचार केला तर थेट वंशज आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या देवास घराण्यापासून नंतर नागपूरकर घराण्यातून थेट मुलीच्या बाजूने वंशज असलेले सध्याचे शाहू महाराज आहेत. हा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. पण स्वतःच्या राजाला बदनाम करण्यासाठी स्वतःला पुरोगामी समजणारे संजय मंडलिक आता चुकीच्या मार्गाने जात आहेत. त्यांना असे वक्तव्य शोभत नाही. केवळ शाहू महाराजांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे.

हेही वाचा…रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले की, मंडलिकांचे हे इतिहासातील अज्ञान असून भारतीय हिंदू संस्कृती परंपरेनुसार औरस पुत्राइतकाच दत्तक पुत्रालाही अधिकार असतो. त्यामध्ये फरक केला जात नाही. शाहू महाराजांसाठी त्यांनी जर असा निकष लावला असेल तर राजर्षी शाहू महाराज हे देखील दत्तकच होते. मग संजय मंडलिक त्यांनाही छत्रपतींच्या गादीचे वारस मानणार नाहीत का? बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे देखील दुसऱ्या घराण्यातून दत्तक आले. पण आधुनिक, वैज्ञानिक आणि कर्तबगार असे ते देशातील एकमेव राजे बनले. हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. पण राजकारणासाठी, स्वार्थासाठी चिखलफेक करण्याची संजय मंडलिक यांची कृती अश्लाघ्य अशीच आहे.

हेही वाचा…आमदार प्रकाश आवाडे हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात; पंचरंगी लढतीमुळे चुरस वाढली

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये दत्तक प्रथा अतिशय प्राचीन आहे. दत्तक राजे पराक्रमी, शूर आणि कर्तृत्ववान होते. राजर्षी शाहू महाराज यांनी दत्तक आल्यानंतरच रयतेचे राज्य आणि समतेचा विचार दिला. तोच विचार सध्या शाहू महाराज ताकतीने पुढे नेत आहेत. संजय मंडलिक यांचा दत्तक म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार हा जुने प्रकरण उकरून काढून प्रसिद्धी मिळवण्यासाठी असून ज्या राजवाड्यावर संजय मंडलिक नेहमी जाऊन पाया पडत होते त्यांना हा प्रश्न आत्ताच का सुचला हे आता नागरिकच त्यांना विचारतील.