कोल्हापूर : इचलकरंजीच्या सुळकुड प्रश्नाची गांभीर्याने दखल राज्य शासनाने घ्यायला हवी होती. या प्रश्नाचे गांभीर्य बाजूला ठेवून केवळ निवडणूकपूर्व राजकारण सुरू झाले आहे, अशी बोचरी प्रतिक्रिया कृति समितीच्या वतीने मंगळवारी व्यक्त करण्यात आली आहे.
इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी या मागणीसंदर्भात पुढील आंदोलन व कार्यक्रम निश्चित करण्यासाठी शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक ४ वाजता समाजवादी प्रबोधिनी, इंडस्ट्रियल इस्टेट, इचलकरंजी येथे शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संघटना कार्यकर्ते व जागरूक नागरिक यांचा जाहीर मेळावा समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये इचलकरंजी शहर व परिसरातील सर्व पक्ष, सामाजिक संघटना व याप्रश्नी आंदोलनात सहभागी होण्यासाठी इच्छुक असणारे सर्व कार्यकर्ते व जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन कृति समितीच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
आणखी वाचा-यंत्रमाग उद्योग अभ्यास समितीचा बहुप्रतीक्षेत अहवाल सादर; कुतूहल वाढले
इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची त्वरीत अंमलबजावणी व्हावी यासाठी ५ ऑगस्ट रोजी याप्रश्नी समन्वय समिती स्थापन झाली. योजना कार्यान्वित करण्याबाबत मा. मुख्यमंत्री यांनी ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली. तेव्हापासून आज अखेर गेल्या पाच महिन्यात संबंधित आमदार, खासदार व मंत्री यांचेकडून यासंदर्भात कोणतेही प्रयत्न झाल्याचे दिसून आलेले नाही. मा. वस्त्रोद्योग मंत्री यांनी दि. ८ जानेवारी रोजी बैठक लावण्याचे आश्वासन दिले. तेही अंमलात आले नाही. याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती. प्रत्यक्षात या प्रश्नाचे गांभीर्य बाजूला ठेवून केवळ निवडणूकपूर्व राजकारण सुरू झाले आहे.
आणखी वाचा-कोल्हापूर: गुजरी पेठेत भरदिवसा दरोडा, तिघांना अटक; १५ लाखाचे दागिने जप्त
इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या समन्वय समितीच्या आज झालेल्या बैठकीत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये शशांक बावचकर, मदन कारंडे, सयाजी चव्हाण, सागर चाळके, पुंडलिक जाधव, कॉ. सदा मलाबादे, कॉ. सुनील बारवाडे, जाविद मोमीन, अभिजित पटवा, वसंत कोरवी, राहुल खंजीरे, नितीन जांभळे, विकास चौगुले, विजय जगताप, कॉ. दत्ता माने, उमेश पाटील, महादेव गौड, प्रसाद कुलकर्णी, राजू कोन्नूर, राजू आलासे, माधुरी सातपुते, रिटा रॉड्रिग्युस, सुस्मिता साळुंखे, शेखर पाटील, विद्याधर पाटील उपस्थित होते.