कोल्हापूर : मी कोणत्याही सहकारी संस्थेचा साधा संचालकही नाही. हाडाचा शेतकरी आहे. अशावेळी राजू शेट्टी यांनी मला साखर कारखानदाराचा मोहरा म्हणणे चुकीचे आहे असे मत ठाकरे सेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी काल सत्यजित पाटील यांना साखर कारखानदारांचे प्रतिनिधी ठरवले होते. त्यांचे वडील कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. माझ्यासारख्या शेतकरी नेत्याचा पराभव करण्याच्या हालचाली कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखानदाराकडून सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा : सांगलीतील नाराजीचा हातकणंगलेत परिणाम नाही; ‘मविआ’च्या नेत्यांचा निर्वाळा

याला उत्तर देताना माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, माझे घराणे राजकीय आहे. मी चार विधानसभा निवडणुका लढल्या आहेत. आता पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आलो आहे. मी कोणत्याही सहकारी संस्थेत साधा संचालक नाही.साखर कारखानदारी नसती तर महाराष्ट्राचा विकास झाला नसता. कारखानदार हे काही समाजाचे शत्रू नाहीत. राजू शेट्टी यांना देखील आम्ही शत्रू मानत नाही. माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी जुळलेली असल्याने या निवडणुकीत मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून उतरलो आहे.

हेही वाचा :

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडावेळी मी गोव्याला गेल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप बिनबुडाचा आहे, असा उल्लेख करून पाटील म्हणाले, मुळात मी कोणत्याही सभागृहाचा सदस्य नाही. माजी आमदारांना मताचा अधिकार नसतो हे शेट्टी यांना माहित आहे. माझी निष्ठा पक्की असल्याने विरोधी गटातील माझ्या मित्रांनी मला ऑफर देण्याचे धाडस दाखवले नव्हते. सरकार आणि सामान्य माणूस यांच्यातील एक चांगला दुवा होणे हेच माझे मुख्य उद्देश आहे.