कोल्हापूर श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी प्रथेप्रमाणे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात श्री वरद लक्ष्मी पूजा करण्यात आली. वर्षातील केवळ याच दिवशी देवीची अलंकार पूजा बांधली जात नाही. भविष्योत्तर पुराण व व्रतराज या ग्रंथात या व्रताचा विधी व इतिहास मिळतो. गौरी शंकर सारिपाट खेळत असताना चित्रनेमी या गंधर्वाने पार्वतीचा अवमान केल्यावर तिने ‘तू कुष्ठी हो’ असा शाप दिला. त्याने क्षमा मागताच ‘तू देवांगना सांगतील तसे वरदलक्ष्मीचे व्रत कर’ असा उपाय ही सांगितला. व्रत केल्याने चित्रनेमी शापमुक्त झाला. हे व्रत पुढे स्वप्न दृष्टांताने चारूमती नावाच्या स्त्रीने केल्यावर ती सुख संपदेची धनी झाली. अशी असते पूजा प्रत्येकी २१ फुले, पत्री मोदक, दोरक (व्रताचे धागे) अशा वस्तू देवीला अर्पण करून प्रार्थना करणे असा व्रताचा विधी आहे. कोल्हापूर महालक्ष्मी ही आदिशक्ती आहे दुर्गा सप्तशती मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे महालक्ष्मी चैत्रात चैत्रगौरी म्हणून झोपाळ्यावर बसते. तर आता श्रावणात वरदलक्ष्मी म्हणून पूजाकेली जाते. श्रीपूजकांच्या घरांपैकी पाच कुटुंब परंपरेने आपले कुलोपाध्याय लाटकर जोशी (स्मार्त) वैष्णव जोशी यांच्या पौरोहित्याखाली हे व्रत करण्यात आले.