कोल्हापूर : कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून वारे तापले असताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २२ मे रोजी नवी दिल्ली येथे एका बैठकीचे आयोजन केले आहे. यासाठी खासदार धैर्यशील माने यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर, सांगली आणि परिसराला दर वर्षी महापुराचा सामना करावा लागतो. याला अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक शासन करीत आहे.
धरणाची उंची वाढवल्यास महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांच्या जीविताला, शेतीला धोका निर्माण होतो, अशी भूमिका खासदार माने यांनी घेतली आहे. त्यांच्या मागणीची दखल घेत जलशक्ती मंत्रालयाने या विषयावर एक विशेष बैठक २२ मे रोजी संसद भवनातील ‘डी’ समिती कक्षात आयोजित केली असून अलमट्टी धरणाचा संभाव्य परिणाम, राज्यांमधील समन्वय, पूरनियंत्रण, महाराष्ट्राच्या जलहक्कांचे संरक्षण, नद्यांचे प्रवाह नियंत्रण, पूरप्रभावित भागांचे दीर्घकालीन नियोजन या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे माने यांनी सांगितले.