लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : रंकाळा टॉवर परिसरात काल सायंकाळी दोन गटातील वर्चस्वातून खून केल्याप्रकरणी ८ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हेने शाखेच्या पथकाने तासात जेरबंद केले आहे.

रंकाळा टॉवर परिसरात अजय उर्फ रावण दगडू शिंदे (वय २५, यादव नगर) याचा सात ते आठ आरोपींनी भर रहदारीच्या ठिकाणी धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. निर्घृण खुनाने शहरात खळबळ उडाली होती. या घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

आणखी वाचा-अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

याप्रकरणी राज संजय जगताप, आकाश आनंदा माळी, सचिन दिलीप माळी, रोहित अर्जुन शिंदे, निलेश उत्तम माळी, गणेश सागर माळी, प्रशांत संभाजी शिंदे यांना इस्पुर्ली (ता. करवीर) व निलेश बाबर यास सायबर चौकातून ताब्यात घेतले. अजय शिंदे व संशयित आरोपी यांच्यात पूर्वी वाद झाला होता. तो मिटवण्यासाठी त्यांनी अजयला रंकाळा टॉवर येथे बोलून घेतले सोबत असलेल्या शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची कबुली त्यांनी शुक्रवारी पोलिसांना दिली आहे.