कोल्हापूर: पावसाने उसंत दिल्यावर आज शेतकऱ्यांनी शेतपिकांची काळजीपूर्वक पाहणी केली असता, कष्टाने पिकवलेली पिके मातीमोल झाल्याचे दिसून आल्याने डोळ्यांत अश्रूंच्या धारा लागल्या. शेतातील उन्हाळी पिके मातीमोल झाली आहेत. पीक काढणीवेळीच आलेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. दरम्यान, गुरुवारपासून नुकसानीच्या या पंचनाम्यास सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यात सलग दहा दिवस मुसळधार पाऊस पडला. संततधार पावसाने भुईमूग, मका, भात, सूर्यफूल ही काढणीला आलेली पिके हातची गेल्याने शेतकरी हवालदिल आहे. दीड एकरातील सूर्यफुलांना कोंब फुटले आहेत. १२ फेब्रुवारीला लागण केली होती. यंदा वातावरण अनुकूल असल्याचे सांगण्यात आल्याने या पिकाकडे वळलो होतो. नैसर्गिक हानी होणार असल्याची योग्य माहिती आधीच दिली असती, तर शेतकरी सावध झाले असते. फायदा राहिला बाजूलाच उलट शेतात कुजलेले पीक काढण्यासाठी लोकांना विनवणी करावी लागत आहे. हवामान बदलाचा फटका शेतकरी कसा सहन करणार, असा प्रश्न कसबा बीड गावातील सुरेश चौगुले यांनी उपस्थित केला. या गावात १५० एकर सोयाबीन, भुईमूग, सूर्यफुलाचे नुकसान झाले आहे. शिरोळ, हातकणंगले, करवीरसह अनेक तालुक्यांत पिके कुजली आहेत. शेतातील उन्हाळी पिकाचे अतोनात नुकसान झाले.

दुसऱ्यांदा फटका

ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे काढणीयोग्य भात, सोयाबीन या खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली होती. आता मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

ऊस पिकासाठी हा पाऊस उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. मेच्या मध्यापर्यंत पाणी देऊनसुद्धा उसाची शिवारे तहानलेली होती. माळावरील ऊस पिके तर अडचणीत येण्याच्या स्थितीत होती. परंतु, गेल्या संपूर्ण आठवड्यात मुसळधार पाऊस पडल्याने काही ठिकाणी ऊसपिकाचे नुकसान झाले आहे. पण, इतरत्र शिवारातील ऊस पिकाला तरतरी आली आहे. उसाची वर्षभराची तहान या पावसाने भागवल्याने बहुतांश ठिकाणी उसाच्या सरी पाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे उसाची वाढ चांगल्या प्रमाणात होईल. एकरी चार ते पाच टन उत्पादनात वाढ होईल, असे निरीक्षण शेतीअभ्यासक रावसाहेब पुजारी यांनी व्यक्त केले. गतवर्षी पावसाने ओढ दिल्याने उसाचे अपेक्षित वाढ झाली नाही. यामुळे कारखान्यांचे गाळप कमी झाल्याने साखर उद्योगाला फटका बसला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजपासून पंचनामे

कृषी सहायकांचा संप असल्याने पंचनाम्यात मर्यादा आल्या होत्या. ते सेवेत रुजू होणार असल्याने गुरुवारपासून या कामाला गती येईल, असे जिल्हा कृषी अधीक्षक जालिंधर पांगरे यांनी बुधवारी सांगितले.