कोल्हापूर : स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठे गाजर दाखवण्यासाठी भाजप चारशे पारचा नारा देत आहे.  भाजप २१४ च्या वर जात नाही ही चंद्रकांत पाटील यांची भीती आहे, असे प्रत्युत्तर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी बुधवारी दिले.

काल एका कार्यक्रमात बोलत असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंडलिक – महाडिक एकीची सतेज पाटील यांना भीती वाटत असावी, असा टोला लगावला होता. त्याला आज सतेज पाटील यांनी उत्तर दिले. पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, देश पातळीवरील फोडाफोडीचे पेटंट फक्त भाजपकडे आहे. तरीही चंद्रकांत पाटील हे आमच्याकडे बोट दाखवत आहेत. माझ्यावर जास्त प्रेम असल्यामुळे टीका केली जात असावी. तथापि कोल्हापूरची अस्मिता असलेले शाहू महाराजांना दिल्लीला पाठवायचा निर्धार जनतेने केला असल्याने लोकांना विचलित करण्यासाठी चंद्रकांत पाटील आरोप करीत आहेत.

हेही वाचा…हातकणंगलेत पुन्हा एकदा साखर कारखानदार – शेतकरी नेत्यात लढत

राज ठाकरे महायुतीमध्ये जाऊन दोन-चार जागांवर लढतील असे वाटत होते. निवडणूकच लढवायची नाही ही त्यांची भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मान्य झालेली नसावी. यामुळे काहीजण पक्ष सोडून जाताना दिसत आहेत. त्यांच्या भूमिकेत इतका बदल का झाला हे कळायला मार्ग नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली.

जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात तिन्ही पक्ष एकदिलाने काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळेल. काही दोन चार ठिकाणी नाराजी असते ती दूर केली जाईल. भाजपला थांबवणे हेच आमच्या सगळ्यांचे एकमेव ध्येय असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा…राजू शेट्टी यांनी मला साखर कारखानदाराचा मोहरा म्हणणे चुकीचे – सत्यजित पाटील सरूडकर

काँग्रेसच्या वाट्याला जागा कमी आल्या असल्याचे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होते. यावरही बोलताना त्यांनी महाविकास आघाडी म्हणून जागा वाटपावर चर्चा झालेली आहे.  त्यामुळ यावर उघड भाष्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.  काँग्रेस कुठेही एकाकी पडली नाही, काँग्रेस पक्षातून बाहेर गेलेल्या नेत्यांच्या टीकेला किती महत्व द्यायचं? कारण अशोक चव्हाण देखील त्या बैठकांना उपस्थित असायचे, काँग्रेसला लक्ष्य करून नागरिकांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा…सांगलीतील नाराजीचा हातकणंगलेत परिणाम नाही; ‘मविआ’च्या नेत्यांचा निर्वाळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहू महाराज खासदार झाल्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे संपर्क कार्यालय काढण्यात येणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं होते. यावर खासदार संजय मंडलिक यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सतेज पाटील यांना अजिंक्यतारा कार्यालयाच्या शाखा काढायच्या असल्याची टीका केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी,  काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रत्येक तालुक्यात कार्यालय हा उपक्रम राबवला जातोय. पाच वर्षात विद्यमान खासदार संजय मंडलिक करू शकले नाहीत म्हणून ते आता टीका करत आहेत. याच अजिंक्यताराचा रोल २०१९ साली काय होता? असा प्रती सवालही आमदार सतेज पाटील केला.