कोल्हापूर : कोल्हापुरात गुरुवारी झालेल्या पावसाने शहरातील आपत्कालीन नियोजन पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. आज पावसाने उघडीप दिल्यानंतर शहरवासीयांना तुंबलेल्या शहराची अवकळा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांच्या डोकेदुखीला सामोरे जाण्याची वेळ आली.कोल्हापुरात शहरात काल ५० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला. तीन तासांच्या पावसाने शहराचे आपत्कालीन नियोजन पाण्यात बुडाले. कोल्हापूर शहराच्या सर्वच भागात काल पाणी तुंबले होते.
तुंबलेले दुखणे
महापालिकेच्या निरीक्षणा नुसार २० पेक्षा अधिक सकल भागात पाणी साचले होते. साचलेले पाणी काढून टाकणे हे दुकानदार, फेरीविक्री, नागरिकांसमोर काम होऊन बसले होते. तुंबलेल्या भागाची निर्गत करण्याचे काम महापालिकेचे यंत्रणा दिवसभर करत राहिली.
कोल्हापूरकर जीवावर उदार
कोल्हापूर बसस्थानक आणि व्यापारी पेठ असलेली शाहूपुरी, राजारामपुरी यांना जोडणारा पारीख पुलाचा तुंबलेला रस्ता हा तर नागरिकांच्या चिंतेचा विषय बनला होता. या मध्यवर्ती ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. या जीवघेण्या स्थितीत मार्ग काढण्याची वेळ वाहनधारक, प्रवाशांवर आली होती. ३०-४० वर्षे रेंगाळलेल्या या प्रश्नावरून नागरिकांनी कोल्हापूर महापालिकेसह लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन यांच्यावर टीकास्त्र डागले. एकीकडे तुंबलेल्या शहरास नालेसफाईचे अपयश कारणीभूत असल्याचे बोल नागरिकांकडून लावले जात असताना दुसरीकडे महापालिकेत एका बैठकीत उघड्यावर खरमाती टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देऊन नागरिकांवर ओढावलेल्या संकटातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तर मनापासमोर शंखध्वनी
कोल्हापुरातील १०० कोटीच्या रस्ते कामातील उणिवेमुळे शहरात अस्ताव्यस्त शिरले.हा लोकप्रतिनिधीचा अपयशाचा कळस असला तरी लोकांकडून नियमित कर घेणाऱ्या कोल्हापूर महापालिकेचा असंवेदनशीलतेचा कळस आहे’ अजूनही मोठ्या प्रमाणावर नालेसफाई, गटारांची दुरुस्ती , रस्त्यांची उंची समप्रमाणात करून पाण्याचा निचरा करावा. अन्यथा भर पावसामध्ये महापालिकेसमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकरे सेनेचे उप नेते संजय पवार, सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी शुक्रवारी दिला आहे.