कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने शुक्रवारी रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड केली आहे. आगामी २०२१ टी-२० विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या निवडीनंतर रवी शास्त्री यांनी पहिल्यांदा कॅमेरासमोर येत, आपल्या नेमणुकीबद्दल सल्लागार समितीचे आभार मानले आहेत. यावेळी बोलताना रवी शास्त्री यांनी आगामी काळात भारतीय संघासाठी आपली ध्येय स्पष्ट केली.

अवश्य वाचा – सहायक प्रशिक्षकांची नेमणूकही आम्हालाच करु द्या, सल्लागार समितीचं प्रशासकीय समितीला पत्र

निवड प्रक्रियेदरम्यान रवी शास्त्री यांनी टॉम मूडी-माईक हेसन यांची कडवी झुंज मोडून काढली. “या भारतीय संघावर माझा विश्वास आहे….हा संघ इतिहासात आपली एक वेगळी छाप पाडू शकतो.” आपल्या नेमणूकीबद्दल रवी शास्त्री बोलत होते.

रवी शास्त्री यांची नेमणूक झाल्यानंतर सोमवारपासून भारतीय संघाच्या सहायक प्रशिक्षकांची नेमणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते. मात्र विश्वचषकात भारतीय फलंदाजांनी उपांत्य फेरीत केलेल्या ढिसाळ कामगिरीमुळे संजय बांगर यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. बांगर यांच्याजागेवर प्रविण आमरे आणि विक्रम राठोड यांच्यात चुरस आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रविण आमरेंवर मात करुन विक्रम राठोड भारताने नवीन फलंदाजी प्रशिक्षक बनू शकतात.