विराट कोहली विरुद्ध अनिल कुंबळे वादात कुंबळे यांना दिलेला राजीनामा आणि त्यानंतर संघाच्या प्रशिक्षकपदावर रवी शास्त्री यांची लागलेली वर्णी, यामुळे काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेटमधलं वातावरण ढवळून निघालं होतं. यानंतर रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावरचा हंगाम गाजवून भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानासाठी सज्ज झालेला आहे. यावेळी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं कौतुक केलंय.

“रवी शास्त्रींनी भारतीय खेळाडूंच्या मनातून पराभव आणि त्यातून येणारं अपयश या दोन गोष्टी काढून टाकल्या आहेत. त्यांच्या याच सकारात्मक दृष्टीकोनामुळे भारतीय संघाच्या खेळामध्ये आपल्याला बदल घडलेला दिसतो. आपलं कम्फर्ट झोन मोडून खेळाडू आता काही नवीन गोष्टी करायला लागले आहेत. यामुळेच गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करत असल्याचं”, बांगर यांनी ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

२०१४ साली रवी शास्त्री भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पहायला लागले. २०१५ विश्वचषकानंतर बीसीसीआयने माजी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांना मुदतवाढ न देता शास्त्री यांच्याकडे प्रशिक्षणाची जबाबदारी सोपवली. २०१६ पर्यंत रवी शास्त्री व्यवस्थापक आणि प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावत होते. यानंतर सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या समितीने अनिल कुंबळेंची भारतीय संघाच्या  प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. मात्र चॅम्पियन्स करंडकात अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर कुंबळे आणि कोहली यांच्यातला वाद चांगलाच उफाळून आला. यानंतर विराट कोहलीच्या आग्रहावरुन रवी शास्त्री यांची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

रवी शास्त्रींसोबत २०१४ साली प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरलेल्या संजय बांगर यांनी अजुनही फलंदाजी प्रशिक्षक म्हणून आपली जागा कायम ठेवली आहे. त्यामुळे रवी शास्त्री आणि संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीची टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यात काय कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.