|| तुषार वैती

नवी दिल्लीत रंगलेली महिलांची जागतिक बॉक्सिंग स्पर्धा ही मेरी कोमने गाजवली असली तरी प्रत्येक भारतीयापर्यंत हा खेळ पोहोचवण्यासाठी तसेच खेळाडूंसाठी फायदेशीर ठरली. या स्पर्धेतील यश हे भारतीय खेळाडूंसाठी ऑलिम्पिकसाठी आत्मविश्वास उंचावणारे ठरणार असून या स्पर्धेद्वारे सोनिया चहल, सिमरनजित, लव्हलिना बोर्गोहेन यांच्यासारखे अनेक प्रतिभावान खेळाडू देशाला मिळाले, असे मत भारतीय बॉक्सिंग महासंघाचे महासचिव जय कवळी आणि ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे यांनी मांडले.

सहाव्या जगज्जेतेपदाला गवसणी घालत मेरी कोमने महिलांच्या बॉक्सिंगमध्ये नवा अध्याय रचला. जागतिक स्पर्धेत सहा सुवर्ण आणि एक रौप्य अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली महिला बॉक्सर ठरली आहे.

मेरी कोमचे यश हे भारतासाठी सोन्याहून पिवळे म्हणावे लागेल. काही निर्णय भारताच्या विरोधात गेले, अन्यथा यापेक्षा चांगली कामगिरी भारताकडून घडली असतील. तरीही मेरी कोम वगळता भारताच्या तीन खेळाडूंनी पदके मिळवत ही स्पर्धा यशस्वी केली, असे मत या मान्यवरांनी मांडले

आतापर्यंत खेळाडूंचा सर्वाधिक सहभाग असलेली  स्पर्धा ठरली. ६० देशांमधील २९२ खेळाडू सहभागी झाले होते.या स्पर्धेच्या निमित्ताने भारत आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या आयोजनासाठी सज्ज आहे, हे संपूर्ण देशाला पुन्हा एकदा दाखवून दिले. मेरी कोम आणि अन्य बॉक्सर्सनी मिळवलेले यश हे ऑलिम्पिकसाठी खेळाडूंचा हुरूप वाढवणारे आणि आत्मविश्वास उंचावणारे ठरले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेद्वारे तसेच युवा ऑलिम्पिक स्पर्धेद्वारे नवीन चेहरे भारताला मिळाले. तसेच भारतात कार्यरत असलेल्या  व्यक्तींच्या अफाट मेहनतीतून मिळालेले हे फळ आहे.    – जय कवळी, बॉक्सिंग महासंघाचे महासचिव

भारताला तीन सुवर्णपदकांची अपेक्षा होती. पण काही कारणांमुळे आणि काही निर्णय भारताच्या विरोधात गेल्याने आणखी पदके मिळवता आली नाहीत. कोणत्या क्षणी काय करायला पाहिजे, हे पक्के ठाऊक असल्यामुळे मेरी कोमने अनुभवाच्या जोरावर बाजी मारली. बॉक्सिंग या खेळात प्रदीर्घ काळ टिकून राहणे कठीण असतानाही मेरी गेली अनेक वर्षे आपला दबदबा राखून आहे. हे यश सुखावणारे असले तरी देशात आणि महाराष्ट्रात खूप गुणवत्ता असून ती वर आणण्यासाठी अपेक्षित प्रयत्न होत नाहीत.     – मनोज पिंगळे, ऑलिम्पियन बॉक्सर