जगभरासह भारतात पसरलेल्या करोना विषाणूमुळे अनेक महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा आता १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत ही वन-डे मालिकाही रद्द केली आहे. त्यामुळे पुढील काही महिने आपले आवडते खेळाडू मैदानावर उतरताना दिसणार नाहीत.

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर १५ एप्रिलपर्यंत नियंत्रण आलं तर…आयपीएल स्पर्धा पुन्हा खेळवली जाऊ शकते. मात्र स्पर्धेच्या भवितव्याबद्दल अजुनही मतमतांतर आहेत. जाणून घेऊयात भारतीय संघाचा उर्वरित महिन्यांचा कार्यक्रम –

१) भारताचा श्रीलंका दौरा –
आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ जुन-जुलै महिन्यात ३ वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे.

२) इंग्लंडचा भारत दौरा –
सप्टेंबर महिन्यात इंग्लंडचा संघ ३ वन-डे आणि टी-२० सामन्यांसाठी भारतात येईल.

३) आशिया चषक टी-२० –
सप्टेंबर महिन्यातच भारत आशिया चषकात सहभागी होईल. सध्या स्पर्धा कुठे खेळवली जाईल याबद्दल अंतिम निर्णय बाकी आहे.

४) भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा –
ऑक्टोबर महिन्यात भारत ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.

५) आयसीसी टी-२० विश्वचषक –
१८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच राहणार आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या वेळापत्रकाप्रमाणे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.