हॅरिस शिल्ड ही स्पर्धा क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. परंतु या स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये एक अजब-गजब घटना घडली. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल आणि अंधेरीच्या चिल्ड्रन वेलफेअर या शाळांमध्ये क्रिकेटचा सामना रंगला होता. परंतु चिल्ड्रन वेलफेअर शाळेचा संपूर्ण संघच शून्यावर बाद झाला. चिल्ड्रन वेलफेअर शाळेचा संघ सहा षटकं खेळला. परंतु सहा षटकांमध्ये कोणत्याही खेळाडूला खातंही उघडता आलं नाही.

चिल्ड्रन वेलफेअर विरूद्ध स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुलदरम्यान क्रिकेटचा सामना रंगला होता. आझाद मैदानावर रंगलेल्या या सामन्यात फलंदाजी करत स्वामी इंटरनॅशनल शाळेनं ३९ षटकांमध्ये ७६१ धावांचा डोंगर उभा केला होता. या सामन्यात मित मयेकरनं ५६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीनं नाबाद ३३८ धावा केल्या. दरम्यान, चिल्ड्रन वेलफेअर शाळेनं तीन तासांमध्ये नियोजित षटकं पूर्ण न केल्यानं स्वामी विवेकानंद शाळेच्या संघाला १५६ अतिरिक्त धावा देण्यात आल्या.

यानंतर फलंदाजीला आलेल्या चिल्ड्रन वेलफेअर शाळेच्या संघाला एकही धाव करता आली नाही. चिल्ड्रन वेलफेअर शाळेच्या खात्यात सात धावा आहेत. परंतु त्या सर्व धावा अतिरिक्त आहेत. त्यामुळं त्यांचा संपूर्ण संघ हा शून्य धावांवरच बाद झाला. स्वामी विवेकानंद शाळेकडून खेळताना अलोक पालनं तीन धावा देत सहा गडी बाद केले. तर कर्णधार वरोद वाजे यानं तीन धावा देत दोन बळी टिपले. भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेचा माजी विद्यार्थी आहे.