डॉ. प्रकाश परांजपे
चित्रातल्या डावाची चर्चा करताना आपण बघितलं की दक्षिण खेळाडू क्रमाने इस्पिक एक्का, किलवर एक्का, चौकट एक्का, किलवर राजा खेळेल. किलवर राणी त्यावर पडली नाही तर पुढच्या दस्ताला चौकट दश्शी खेळेल आणि ‘आठ असेल नऊ नसेल’ या ठोकताळ्यानुसार उत्तरेच्या हातातून छोटं पान खेळून चौकट पंथात ५ दस्त मिळवेल आणि ठेका वटवेल! काही आठवडय़ांपूर्वी शिरीष शेवडे यांनी या संबंधात एक मार्मिक प्रश्न उपथित केला होता. ते म्हणतात की प-पू खेळाडूंची पानं माहिती नसताना चौकट पंथात ५ दस्त मिळतील असं म्हणणं योग्य आहे का? चौकट राणी पूर्वेकडे असेल तर ठेका बुडेलच, नाही का? पूर्व-पश्चिमेच्या चौकटच्या १-२ पानांची अदलाबदल केली तर ठेका बुडीत खातीच टाकावा लागेल ना?
त्यांचा प्रश्न बरोबर आहे. प-पू खेळाडूंची पानं दक्षिणेच्या खेळाडूला दिसत नसतात. न दिसणाऱ्या पानांची विभागणी विविध प्रकारे होऊ शकते. यामध्ये जास्तीत जास्त वेळा सफल होईल अशी योजना, असा खेळ त्याला शोधावा लागतो. प्रतिस्पध्र्यानी दिलेल्या बोली आणि खेळलेली पानं यांवरून काही आडाखे बांधता येतात; संख्याशास्त्र, मेरुप्रस्तार ही तंत्रं वापरून पानांची कुठल्या प्रकारची विभागणी जास्त वेळा बघायला मिळते हे समजू शकतं, पण प्रत्यक्ष समोर असलेल्या डावात पानं कशीही विभागलेली असू शकतात. ती उलटी बसली तर योजना फसणार, ठेका बुडणार, यात काही प्रश्नच नाही. अशा परिस्थितीत याबाबत ब्रिज खेळाडूची भूमिका कशी असावी?
असं समजा की हाही एक कर्मयोगच आहे. आपल्या खेळाची योग्य प्रकारे आखणी करणं एवढंच खेळाडूच्या हातात आहे. त्याचं काय फळ मिळेल हे ठरवणं त्याच्या हातात नाही. सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून आखलेला खेळ पानं उलटी पडली तर फसू शकतो. असा एखादा डाव खेळताना नवशिक्या खेळाडूची बरीच घालमेल होते. बघ्याचा डाव खाली आल्यानंतर आपला ठेका बनेल का बुडेल याचा विचार त्याला सतावतो. किलवर राणी कचाटय़ात पकडण्याकरता कसं खेळावं, याचा विचार करताना त्याची त्रेधातिरपिट होते. किलवर एक्का-राजा खेळल्यानंतर राणी पडली नाही तर नाना प्रकारच्या खुळ्या कल्पना त्याच्या डोक्यात येतात. आजचा दिवस आपला नाही, आपलं नशीबच वाईट आहे वगैरे वगैरे. यामध्ये फार वेळ आणि श्रम वाया जातात.
निष्णात खेळाडूची भूमिका निष्काम कर्मयोग्यासारखी असते. बऱ्याच डावांत योग्य खेळ कुठला हे कसलेला खेळाडू झटकन ठरवू शकतो. प्रतिस्पर्धीसुद्धा तज्ज्ञ असले तर ‘अमुक अमुक पान पूर्वेकडे असेल तर १२ दस्त, नाही तर ११’ असं म्हणून खेळाडू आपला डाव खाली मांडतो. प्रतिस्पध्र्याची मान्यता मिळाली की प्रत्येक पान खेळण्यात वेळ न घालवता डाव लगोलग संपवता येतो.
हे वर्ष लोकमान्य टिळकांच्या पुण्यशताब्दीचं आहे. या निमित्ताने ‘गीतारहस्य’ या त्यांच्या ग्रंथातील कर्माबद्दलचं विवेचन खचितच वाचण्यासारखं आहे. ब्रिज खेळताना आणि ब्रिजच्या डावांची चर्चा करताना ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ हा श्लोकआणि त्यावरचं लोकमान्यांचं भाष्य यांची आठवण ठेवलीत तर खेळात तुमची प्रगती नक्कीच वेगाने होईल.
panja@demicoma.com
(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)