सलामीवीर रोहित शर्माने झळकावलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात विजय संपादन केला. आफ्रिकेवर ६ गडी राखून मात करत भारताने स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली. मुंबईकर रोहित शर्माने या सामन्यात १४४ चेंडूत नाबाद १२२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. या खेळीदरम्यान रोहित शर्माने अनेक विक्रमांची आपल्या नावावर नोंद केली आहे.

१) भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. आफ्रिकेविरुद्ध रोहितने आपल्या वन-डे कारकिर्दीतलं २३ वं शतक झळकावलं. या यादीमध्ये सचिन तेंडूलकर ४९ शतकांसह पहिल्या तर विराट कोहली ४१ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार सौरव गांगुलीचा २२ शतकांचा विक्रम मोडीत काढला.

२) रोहितने आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात १२८ चेंडूंमध्ये आपलं शतक साजरं केलं. त्याच्या २३ शतकांपैकी हे सर्वात धीम्या गतीने झळकावलेलं शतक ठरलं.

अवश्य वाचा – World Cup 2019 IND vs SA : हिटमॅनची ‘आफ्रिकन सफाई’ ! सलामीच्या सामन्यात भारत विजयी

३) रोहित शर्माचं शतक हे विश्वचषक इतिहासात भारतीय खेळाडूने झळकावलेलं २६ वं शतक ठरलं. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांच्या खेळाडूंनीच विश्वचषकत २६ शतकं झळकावली आहेत.

४) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (वन-डे, कसोटी आणि टी-२०) १२ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित नववा फलंदाज ठरला आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : पहिल्याच सामन्यात हिटमॅन चमकला, दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत मानाचं स्थान

५) धावसंख्येचा पाठलाग करतानाच्या निकषावर रोहित शर्माच शतक हे भारतीय खेळाडूचं विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोत्तम शतक ठरलं आहे. १९९६ च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने केनियाविरुद्धच्या सामन्यात नाबाद १२७ धावा केल्या होत्या. तो अजुनही पहिल्या स्थानावर कायम आहे.

६) धावांचा पाठलाग करताना सर्वाधीक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा चौथ्या स्थानावर पोहचला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील शतक हे रोहित शर्माचं धावांचं पाठलाग करतानाचं ११ वं शतक ठरलं. या यादीमध्ये विराट कोहली २५ शतकं, सचिन तेंडुलकर १७ शतकं, ख्रिस गेल १२ शतकं, तिलकरत्ने दिलशान ११ शतकं हे फलंदाज रोहितच्या पुढे आहेत.

७) आफ्रिकेविरुद्धचा विजय हा कर्णधार विराट कोहलीचा ५० वा विजय ठरला. ६९ वन-डे सामन्यांमध्ये विराटने ही कामगिरी करुन दाखवली आहे.

८) विश्वचषक इतिहासात सुरुवातीचे ३ सामने गमावण्याची आफ्रिकेची ही पहिलीच वेळ ठरली आहे.