विराट कोहली हा आक्रमक खेळाडू आहे. फलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण असो, त्यात त्याची आक्रमकता कायम दिसून येते. भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यापासून ही आक्रमकता संघातही दिसून येत आहे. याच आक्रमकतेच्या बाबतीत आज विराटने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विराटाच्या मते आक्रमकता म्हणजे काय हे त्याने सांगितले आहे. 'माझ्यासाठी आक्रमकता म्हणजे काहीही करून सामना जिंकणं असं आहे. माझ्या संघाला सामना जिंकवून देण्याची जिद्द म्हणजे आक्रमकता अशी माझी व्याख्या आहे. प्रत्येकाची ही व्याख्या वेगळी असू शकते. पण माझ्यासाठी १२० टक्के प्रयत्न करणे आणि संघाला कोणत्याही किमतीत विजय मिळवून देणे म्हणजे आक्रमकता आहे', असे कोहली म्हणाला. For me aggression is the passion to win games for the team - Virat Kohli #AUSvIND pic.twitter.com/hxrZu7Mce1 — BCCI (@BCCI) November 20, 2018 मी मैदानावर खेळत असेन किंवा बाहेर बसून प्रत्येक चेंडूवर टाळ्या वाजवून खेळणाऱ्या खेळाडूंचे मनोधैर्य वाढवत असेन. हे सारं माझ्यासाठी आक्रमकतेच्या व्याख्येतच येते. एखाद्या सामन्यात 'काहीही' करून जिंकणारा असा भारताचा संघ नाही. पण आम्ही एक स्वाभिमानाची रेघ ओढून ठेवली आहे. जर प्रतिस्पर्धी खेळाडूने ती रेघ ओलांडली, तर मात्र आमचा संघदेखील आक्रमक खेळ करेल, असे सूचक वक्त्यव्य त्याने केले.