बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताने १ बाद ८६ धावा केल्या. बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पहिल्या डावात हा निर्णय त्यांच्या विरोधात गेला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचा पहिला डाव केवळ १५० धावांत आटोपला. त्यानंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. पण चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल या दोघांनी दमदार खेळी केली. या दोघांनी ७२ धावांची नाबाद भागीदारी केली. सध्या मयंक अग्रवाल ३७ तर पुजारा ४३ धावांवर खेळत आहे.

त्याआधी, शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. पण दुसऱ्या सत्रात बांगलादेशकडून चांगली झुंज पहायला मिळाली. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा करून मोमिनुल बाद झाला. मोमिनुलने ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १०५ चेंडूत ४३ धावा केल्या, पण बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर दीर्घ काळ तग धरता आलं नाही. लिटन दासने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बांगलादेशचा डाव १५० धावांत आटोपला.

मोहम्मद शमीने ३, तर अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी २-२ बळी टिपले.

सामन्यासाठी दोनही संघ पुढीलप्रमाणे –

भारत – मयंक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा

बांगलादेश – इम्रुल काइस, शाद्मन इस्लाम, मोहम्मद मिथुन, मोमिनुल हक (कर्णधार), मुश्फिकुर रहीम, महमुदुल्ला, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन, तैझुल इस्लाम, अबू जैद, एबादत हुसेन