IND vs IRE T20 : भारयीय संघ हा सध्या आयर्लंडमध्ये टी२० मालिका खेळत आहे. हि मालिका २ सामन्यांची आहे. त्यापैकी पहिला सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला असून दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाकक्सचे पारडे आयर्लंडच्या तुलनेत जड आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने संघात चार बदल केले आहेत. या बदलाच्या माध्यमातून उमेश यादवला याला अंतिम संघात स्थान मिळाले आहे. ही उमेश यादवसाठी आनंदाची गोष्ट असली, तरीही या सामन्याच्या माध्यमातून त्याच्या नावे एका अजब विक्रमाची नोंद झाली आहे.

उमेश यादव हा भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यातील एक महत्वाचा गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये उमेश यादवने आपल्या धारदार गोलंदाजीने प्रभाव पाडला. त्यानंतर आयर्लंड दौऱ्यातील टी२० सामन्यासाठी त्याची संघात निवड करण्यात आली. परंतु, पहिल्या टी२० सामन्यात उमेशला अंतिम संघात संधी मिळू शकली नाही. मात्र दुसऱ्या टी२० साठी उमेश यादवला अंतिम संघात स्थान मिळाले.

मात्र या संघात स्थान मिळाल्याने एक वेगळाच विक्रम त्याच्या नावे झाला आहे. उमेश यादव हा आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन टी२० सामन्यांत सर्वाधिक अंतर राखलेला भारतीय खेळाडू ठरला आहे.३० वर्षीय उमेश यादवने या आधी ७ ऑगस्ट, २०१२ रोजी टी २० सामना खेळला होता. त्यांनतर तब्बल ६ वर्षांनी त्याला भारताकडून टी२० सामना खेळण्याची संधी लाभली. या दरम्यान उमेश यादवला तब्बल ६५ सामन्यांना मुकावे लागले. या कामगिरीबरोबरच उमेशने दिनेश कार्तिकचा विक्रम मोडीत काढला आहे. दिनेश कार्तिक ५६ सामन्यांना मुकला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले होते.