AFC Asian Cup 2019 स्पर्धेत अ गटात खेळणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाला साखळी फेरीच्या तिसऱ्या सामन्यात बहारिन संघाकडून १-० असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात भारतीय संघाने बहारिनच्या संघाला गोलशून्य बरोबरीत रोखून धरले होते. मात्र त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेत पहिल्याच मिनिटाला बहारिनच्या जमाल रशीदने पेनल्टी किक वर गोल मिळवला. त्याचा हा गोल निर्णायक ठरला आणि भारताला हा सामना गमवावा लागला.

अ गटातील दुसऱ्या सामन्यात युएई आणि थायलंड यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे युएईचा संघ अ गटात ५ गुणांसह अव्वल राहिला आणि त्यांनी ‘राऊंड ऑफ १६’ मध्ये प्रवेश केला.

भारताला पराभूत करणाऱ्या बहारिनच्या संघानेदेखील ४ गुणांसह ‘राऊंड ऑफ १६’ मध्ये प्रवेश केला. तर युएईविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवून थायलंडच्या संघाने ४ गुणांसह भारताला गुणतक्त्यात तळाशी ढकलले.

भारतीय संघाने या स्पर्धेची सुरुवात थायलंडविरुद्ध दणदणीत विजयाने केली होती. त्यामुळे भारताकडून या स्पर्धेत अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताला युएईकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे भारताला तिसऱ्या सामन्यात बहारिनला अस्मान दाखवणे क्रमप्राप्त होते. पण भारताला ते शक्य झाले नाही. त्यामुळे भारतावर साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली.