पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर आणि भारताचं एक विशेष नातं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शोएब अनेक भारतीय क्रीडा वाहिन्यांवर विश्लेषक आणि समालोचक म्हणून काम करत होता. सध्या दोन्ही देशांमध्ये दहशतवादाच्या मुद्द्यावर क्रिकेट खेळवलं जात नाहीये. एका पाकिस्तानी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना शोएबने भारत-पाक संबंधांवर आपलं मत मांडलं आहे.

“भारत एक चांगला देश आहे, तिकडची लोकंही चांगली आहेत. तिकडच्या लोकांना पाकिस्तानसोबत युद्ध हवंय असं मला कधीही वाटलं नाही. मात्र ज्यावेळी मी भारतीय वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहतो, त्यावेळी मला असं वाटतं की उद्यापासून दोन्ही देशांत युद्ध होणार आहे. मी अनेकदा भारतात गेलोय, अनेक शहरांमध्ये फिरलोय. मी खात्रीने सांगू शकतो की पाकिस्तानसोबत काम करण्यासाठी भारतीय लोकं उतावळे आहेत. भारताच्या विकासाचा रस्ता पाकिस्तानातूनच जातो.”

सध्या करोना विषाणूमुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत करोनाचे रुग्ण आढळत आहेत. यावर बोलत असताना शोएब म्हणाला, “करोनामुळे भारताचं अधिक नुकसान होऊ नये ही माझी इच्छा आहे. यामधून हा देश लवकरच सावरेल.” याआधी आपल्या यू-ट्युब चॅनलवर बोलत असताना शोएबने करोनासाठी चीनला जबाबदार धरलं होतं. तुम्ही लोकं, कुत्रे-मांजर-वटवाघुळं कशी खाऊ शकता असा प्रश्न शोएबने विचारला होता.