ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात एकदिवसीय व कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने सोमवारी याबाबत माहिती दिली.
४ डिसेंबर ते १ फेब्रुवारी या कालावधीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाबरोबर चार कसोटी सामने खेळणार आहे. तसेच इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचा सहभाग असलेल्या तिरंगी वनडे स्पर्धेतही तो सहभागी होणार आहे. पहिली कसोटी ४ डिसेंबर रोजी ब्रिस्बेन येथे सुरू होणार आहे. त्यानंतर अ‍ॅडलेड (१२ ते १६ डिसेंबर), मेलबर्न (२६ ते ३० डिसेंबर), सिडनी (३ ते ७ जानेवारी) येथे कसोटी सामने होतील. तीन देशांच्या स्पर्धेला १६ जानेवारीस प्रारंभ होईल.१ फेब्रुवारी रोजी पर्थ येथे अंतिम लढत होईल. ब्रिस्बेन येथे २००३-०४ मध्ये भारताचा कसोटी सामना झाला होता. त्यानंतर प्रथमच तेथे भारताचा सामना होणार आहे. विश्वचषक स्पर्धा १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.