विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा तिसऱ्या टी-२० सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं १२ धावांनी पराभव केला. यासोबतच तीन सामन्याची टी-२० मालिका भारतानं २-१ च्या फरकानं जिंकली आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारताची विजयी घौडदौड रोखली आहे. याआधी भारतीय संघानं लागोपाठ ११ सामन्यात पराभव न होण्याचा विक्रम केला होता. मात्र, ऑस्ट्रेलियानं विराटसेनेचा विजयरथ रोखला आहे.

२०१९ मध्ये भारतानं विडिंजचा मुंबईत पराभव केला होता. त्यानंतर २०२० च्या सुरुवातीला श्रीलंकाविरोधात टी-२० मालिका पार पडली होती. यात पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर उर्वरित दोन्ही सामन्यात भारतानं विजय संपादन केला होता. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं लागोपाठ पाच टी-२० सामने जिंकले होते. आता ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन सामन्यात पराभव करत दहा विजयाची नोंद केली. मात्र, टी-२० मालिकेतील अखेरचा सामना ऑस्ट्रेलियानं जिंकत भारतीय संघाचा विजयरथ रोखला.

अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजीचं मोठं आव्हान परतवून लावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात १२ धावांनी बाजी मारत कांगारुंनी टी-२० मालिकेचा शेवट गोड केला आहे. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारण्यात भारत यशस्वी ठरलाय.