IPL 2019 CSK vs MI Live Updates : चेन्नईविरुद्धच्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या आक्रमक अर्धशतकी (६७) खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने १५५ धावांपर्यंत मजल मारली आणि चेन्नई सुपरकिंग्जला विजयासाठी १५६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी चाहत्यांची निराशा केली. पहिल्या ६ फलंदाजांपैकी ५ फलंदाजांना एकेरी धावसंख्येवर समाधान मानावे लागले. मुरली विजयने एकाकी झुंज देत ३८ धावा केल्या, पण त्याचा झेल खास चर्चेचा विषय ठरला.

मुरली विजयने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर हलकेच फटका मारला. पण तो चेंडू थेट सूर्यकुमार यादवच्या दिशेने गेला. हा चेंडू जमिनीच्या अगदी जवळ असताना त्याने तो झेल टिपला. हा झेल टिपल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी जल्लोष करण्यास सुरुवात केली, पण चेन्नईच्या गोटात काहीसा गोंधळ उडाला. मैदानावरील पंचांनी झेल टिपला असल्याचे सांगत विजयला बाद घोषित केले होते. पण त्यानंतरही गोंधळ तसाच असल्याने अखेर तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. तिसऱ्या पंचांनीदेखील विजयला बाद ठरवल्यानंतर त्याने मैदान सोडले. पण IPL ने आपल्या संकेस्थळावर हा व्हिडीओ शेअर करत फलंदाज ‘बाद की नाबाद हे तुम्हीच ठरवा’ असे कॅप्शन दिले.

दरम्यान, त्याआधी मुंबईने दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसनने ३ चेंडूत २ चौकार लगावत तडाखेबाज सुरुवात केली होती, पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. मलिंगाने त्याला चतुर गोलंदाजी करत माघारी धाडले. धोनीच्या जागी नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेला कर्णधार सुरेश रैना केवळ २ धावा करून झेलबाद झाला आणि चेन्नईला दुसरा धक्का बसला. उंच फटका मारताना तो माघारी परतला. प्रतिभावान फलंदाज अंबाती रायडू त्रिफळाचीत झाला. तो ३ चेंडू खेळला पण त्याला भोपळाही फोडता आला नाही. केदार जाधव खेळपट्टीवर स्थिरावत असताना त्याला कृणालने त्रिफळाचीत केले. केदारने ६ धावा केल्या. नव्या दमाच्या ध्रुव शोरे यांच्याकडून चेन्नईला अपेक्षा होत्या, पण तो मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. तो ५ धावा काढून माघारी परतला.

एकीकडे गडी झटपट बाद होताना एकाकी झुंज देणारा मुरली विजय १२ व्या षटकात झेलबाद झाला. पहिल्या सहा फलंदाजांमध्ये दुहेरी धावसंख्या गाठणारा तो एकमेव फलंदाज ठरला. विजयने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ३८ धावा केल्या.

हे वाचा : चेन्नईला नमवून मुंबई ‘किंग’; ४६ धावांनी विजयी

त्याआधी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली, मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे मुंबईला मोठी झेप घेता आली नाही. मुंबईच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करत आपले इरादे स्पष्ट केले होते. मात्र क्विंटन डी-कॉक लवकर माघारी परतला. यानंतर एविन लुईसच्या साथीने रोहितने मुंबईचा डाव सावरला. रोहितने ४८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. त्याला साथ देणाऱ्या एविन लुईसने ३२ धावा केल्या. मात्र लुईस माघारी परतल्यानंतर मुंबईच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुरती निराशा केली. आवश्यक धावगतीने खेळणं मुंबईच्या फलंदाजांना जमलं नाही.

मधल्या षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश लावला. अखेरीस हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी मुंबईला १५५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून मिचेल सँटनरने २, तर दिपक चहर आणि इम्रान ताहीरने प्रत्येकी १-१ बळी घेतला.