IPL 2019 MI vs RCB Live Updates : वानखेडे मैदानावर मुंबईने बंगळुरूला ५ गडी राखून पराभूत केले. मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईने बंगळुरूला पाणी पाजले. ६ सामन्यानंतर १ विजय मिळवलेल्या बंगळुरूच्या पदरी आज पुन्हा एकदा निराशा आली. बंगळुरूने दिलेले १७२ धावांचे आव्हान मुंबईने ६ चेंडू राखून पूर्ण केले. १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा 'हिटमॅन' रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी संघाला दणकेबाज सुरुवात करून दिली. या दोघांनी तुफान फटकेबाजी करत २५ चेंडूत मुंबईला अर्धशतक गाठून दिले. दणकेबाज सुरुवात केल्यानंतर अखेर सलामीची जोडी फुटली. ७० धावांच्या भागीदारीनंतर रोहित बाद झाला. त्याने २ चौकार आणि २ षटकार लगावत २८ धावा केल्या. रोहित शर्मा पाठोपाठ क्विंटन डी कॉकदेखील एकाच षटकात माघारी परतला. मोईन अलीने पहिल्याच षटकात मुंबईचे सलामीवीर माघारी धाडले. डी कॉक ने ५ चौकार आणि २ षटकार खेचत ४० धावा केल्या. धोकादायक सुरुवात करणारा ईशान किशन यष्टिचीत झाला. फिरकीपटूंवर हल्लाबोल करत त्याने ३ षटकारांसह ९ चेंडूत २१ धावा केल्या. पण चौथा षटकार खेचताना तो बाद झाला. संयमी खेळी करणारा सूर्यकुमार यादव फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने २३ चेंडूत २९ धावा केल्या. कृणाल पांड्यादेखील 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या धमाकेदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने १६ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली हा स्विंग होणाऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. जेसन बेहरनडॉर्फ याने त्याला एका चौकारासह ९ धावांवर माघारी धाडले. डावखुरा सलामीवीर पार्थिव पटेल चांगली फटकेबाजी करत होता, पण हार्दिक पांड्याने त्याला माघारी धाडले. पार्थिवने २० चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार खेचत २८ धावा केल्या. एबी डीव्हिलियर्स आणि मोईन अली या जोडीने बंगळुरूच्या डाव सावरला. त्यामुळे बंगळुरूला १४ व्या षटकात शतकी मजल मारता आली. डीव्हिलयर्स आणि मोईन अली या दोघांनी फटकेबाजी करून आपली अर्धशतके पूर्ण केली. पण अर्धशतकानंतर लगेचच मोईन अली माघारी गेला. अलीने ३५ चेंडूत ५० धावा केल्या. क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या पोलार्डने सीमारेषेवरून अप्रतिम थ्रो केला. तो चेंडू थेट स्टंपवर लागला आणि डीव्हिलियर्स धावचीत झाला. त्याने ५१ चेंडूत ७५ धावांची झंझावाती खेळी केली. शेवटच्या षटकात बंगळुरूचा डाव गडगडला. मलिंगाने चतुराईने केलेल्या गोलंदाजीमुळे त्या षटकात केवळ ८ धावा खर्च झाल्या तर ३ बळी मिळाले. मुंबईच्या संघाने अल्झारी जोसेफच्या जागी अनुभवी लसिथ मलिंगाला संधी दिली होती.