IPL 2019 KKR vs RCB : कॅप्टन कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने शुक्रवारी हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्यांच्याच मैदानात १० धावांनी मात देत बंगळुरुने धडाकेबाज कामगिरी केली आहे. २१४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकात्याची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र मधल्या फळीत नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी फटकेबाजी करत कोलकाताला आशा दाखवल्या. पण अखेर संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.

सलामीवीर ख्रिस लिन, सुनील नरिन आणि शुभमन गिल हे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. डेल स्टेन आणि नवदीप सैनीने त्यांना माघारी धाडलं. त्यानंतर शुभमन गिलला फलंदाजीत बढती देण्यात आली. पण तोदेखील फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात विराट कोहलीने शुभमन गिल याच्या एक अजब पद्धतीने झेल टिपला. गिलने ९ चेंडूत ९ धावा केल्या होत्या. पुढच्या चेंडूवर डेल स्टेनने गिलला बाद केले. चेंडू हवेत टोलवताना विराटने झेल घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या हातावर टप्पा पडून मागे केला पण चपळाईने त्याने तो झेल टिपला.

यानंतर भरवशाचा रॉबिन उथप्पाही झटपट माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये ते अपयशी ठरले. नितीश आणि रसेल या दोन्ही खेळाडूंनी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. नितीश राणाने नाबाद ८५ तर रसेलने ६६ धावा केल्या.

त्याआधी, कर्णधार विराट कोहलीचं आक्रमक शतक आणि मोईन अलीने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २१३ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर बंगळुरुच्या फलंदाजांनी आज आश्वासक फलंदाजी केली. मोईन अलीने ६६ तर कर्णधार विराट कोहलीने ५८ चेंडूत १०० धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर पार्थिव पटेल आणि अक्षदीप नाथ झटपट माघारी परतले. मात्र यानंतर विराट कोहली आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी धडाकेबाज अर्धशतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या भागीदारीमुळेच बंगळुरुने आजच्या सामन्यात आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला. कोलकात्याकडून सुनील नरीन, आंद्रे रसेल, हॅरी गुर्ने आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.