भारतीय संघाच्या ५५७ धावांचा पाठलाग करणाऱय़ा न्यूझीलंडच्या संघाचा पहिला डाव केवळ २९९ धावांत संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात २५८ धावांनी भक्कम आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात चांगली झाली होती. किवींची सलामीवीर जोडी गप्तिल आणि लॅथम यांनी शतकी भागीदारी रचून आपले मनसुबे स्पष्ट केले होते. कसोटीच्या तिसऱया दिवसाच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडचा संघ मजबूत स्थितीत होता. गप्तील आणि लॅथम यांनी आपले अर्धशतक देखील पूर्ण केले होते. मात्र, उपहारानंतरच्या खेळात भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले. फिरकीपटू आर.अश्विनच्या फिरकीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हात टेकले. गप्तिल आणि लॅथम जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडच्या धावसंख्येला जणू उतरती कळाच लागली. अश्विनने रॉस टेलर आणि ल्यूक राँची यांना शून्यावर माघारी धाडले. तर विल्यमसनने केवळ ८ धावा केल्या. त्यानंतर जेम्स निशम याने मैदानात चांगली फटकेबाजी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रय़त्न केला खरा पण त्याला दुसऱया बाजून अपेक्षित साथ मिळू शकली नाही. निशमने ७१ धावा केल्या. अश्विनने न्यूझीलंडच्या ६ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून सध्या मार्टिन गप्तिल याने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर लॅथमने अर्धशतक ठोकले. भारतीय संघाच्या दुसरया डावाला चांगली सुरूवात झाली होती. पण ट्रेंट बोल्टचा चेंडू गौतम गंभीरच्या उजव्या खांद्यावर आदळला. दुखापतीमुळे गंभीरला तंबूत परतावे लागले आहे. तिसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या बिनबाद १८ अशी असून भारतीय संघाने २७६ धावांची आघाडी घेतली आहे. मुरली विजय ११ तर पुजारा १ धाव करून नाबाद आहे. तत्पूर्वी भारताने काल पहिला डाव ५ बाद ५५७ धावांवर घोषित केला होता. त्यामुळे आज न्यूझीलंडचा संघ या धावसंख्येला कसे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. इंदूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही कधी उसळी घेणारे तर कधी खाली बसणारे चेंडू पडत असतानाही अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीने दर्जेदार फलंदाजीचा नमुना पेश केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी रचलेली ३६५ धावांचीभागीदारी ही भारताची सर्वोत्तम भागीदारी आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे २००४ साली चौथ्या विकेटसाठी ३५३ धावा केल्या होत्या. कर्णधार कोहलीच्या द्विशतकानंतर अजिंक्य रहाणेही द्विशतक ठोकतो का याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण अजिंक्य रहाणेचे १२ धावांनी द्विशतक हुकले. रहाणेने १८८ धावांची खेळी केली असून यामध्ये १८ षटकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघ अडचणीत असताना कोहली आणि रहाणेने जबाबदारीने फलंदाजी करत भारताला संकटातून बाहेर काढले. पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारतीय संघ ३ बाद १०० असा अडचणीत सापडला होता. त्यावेळी अजिंक्य रहाणे कोहलीला साथ देण्यासाठी मैदानात उतरला. पहिल्या दिवसाचे शेवटचे सत्र, दुसऱ्या दिवसाचे पहिले आणि दुसरे सत्र खेळून काढत रहाणे आणि कोहलीने न्यूझीलंडला यश मिळू दिले नाही. बचाव आणि आक्रमणाचा सुरेख मेळ साधत या दोन्ही फलंदाजांनी भारतीय संघाला सुस्थितीत नेेले होते. India vs New Zealand: दिवसभरातील अपडेट्स -