श्री मावळी मंडळ, ठाणेतर्फे आयोजित ६३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई शहरच्या बंडय़ा मारुती आणि कल्याणच्या शिवशंकर क्रीडा मंडळाने अंतिम फेरीत धडक मारली. बंडय़ा मारुती संघाने विजय नवनाथ मंडळावर २६-७ असा विजय मिळवला. बंडय़ा मारुती संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मध्यंतराला १५-३ अशी भक्कम आघाडी घेतली. सागर पाटील आणि जितेश सापते यांच्या आक्रमक चढाया आणि गणेश सापतेच्या उत्कृष्ट पकडींच्या जोरावर बंडय़ा मारुतीने एकतर्फी विजय मिळवला. शिवशंकर क्रीडा मंडळाने ठाण्याच्या श्री समर्थ क्रीडा मंडळ कालवार संघावर १६-९ अशी मात केली. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. मध्यंतराला शिवशंकर क्रीडा मंडळाकडे २ गुणांची नाममात्र आघाडी होती. उत्तरार्धात शिवशंकरतर्फे नीलेश साळुंखेने खोलवर चढाया करत संघाला शानदार विजय मिळवून दिला.