मुंबईचे दमदार पुनरागमन; पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण

मुंबई : उदयोन्मुख २२ वर्षीय फलंदाज सर्फराज खानने (नाबाद ३०१ धावा) साकारलेल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या झुंजार त्रिशतकाच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उत्तर प्रदेशविरुद्धचा सामना अनिर्णित राखून पहिल्या डावातील आघाडीचे महत्त्वपूर्ण तीन गुण मिळवले.

विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशकडूनच खेळणाऱ्या सर्फराजने त्यांच्याच विरुद्ध त्रिशतक झळकावल्यामुळे क्रीडाप्रेंमीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव केला जात आहे.

एलिट ‘ब’ गटातील या लढतीत उत्तर प्रदेशच्या पहिल्या डावातील ६२५ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने चौथ्या दिवशी ७ बाद ६८८ धावांवर डाव घोषित केला. ३० चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ३०१ धावा फटकावणारा सर्फराज सामनावीर ठरला. सोमवारपासून मुंबईचा हिमाचल प्रदेशविरुद्ध सामना रंगणार आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मंगळवारच्या ५ बाद ३५३ धावांवरून पुढे खेळताना सर्फराज आणि कर्णधार आदित्य तरे यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या सत्रात उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांना एकही बळी मिळू दिला नाही. मात्र सिद्धेशप्रमाणेच आदित्यही नव्वदीच्या घरात येऊन माघारी परतला. १४ चौकारांसह ९७ धावा करणाऱ्या आदित्यने सर्फराजसह सहाव्या गडय़ासाठी १७९ धावांची भागीदारी रचली. ६ बाद ५१७ धावांनतरही सर्फराजने हार न मानता तळाच्या फलंदाजांना साथीला घेत पहिल्या डावातील आघाडी घेण्याच्या दिशेने कार्य सुरू ठेवले.

द्विशतक साकारल्यानंतर सर्फराजने अधिक आक्रमक खेळ केला. अष्टपैलू शाम्स मुलानीच्या साथीने त्याने सातव्या गडय़ासाठी १५० धावांची भागीदारी रचून मुंबईला पहिल्या डावातील आघाडी मिळवून दिली. मुलानी ६५ धावांवर माघारी परतल्यावर आकाश पारकरच्या (नाबाद ८) साथीने सर्फराजने दिवसाची उर्वरित षटके खेळून काढली. २९४ धावांवर खेळत असताना लाँग-ऑनच्या दिशेने षटकार लगावून सर्फराजने त्रिशतकाला गवसणी घातली व सामना जिंकल्याच्या आवेशात जल्लोष केला. सर्फराजचे त्रिशतक होताच मुंबईने ६८८ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर पंचांनी सामना अनिर्णित झाल्याचे जाहीर करत मुंबईला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण बहाल केले.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी प्रकृती बिघडली आहे. परंतु मला माझ्या खेळावर विश्वास होता. मी खेळपट्टीवर ठाण मांडल्यास संघाला नक्कीच सावरू शकतो, याची जाणीव होती. त्यामुळेच त्रिशतकी खेळी साकारू शकलो.

सर्फराज खान, मुंबईचा फलंदाज

सर्फराज आपल्या फलंदाजीवर मेहनत घेत आहे. त्याच्यात अफाट गुणवत्ता असून एक क्रिकेटपटू म्हणून तो परिपक्व होत आहे. त्याच्या त्रिशतकी खेळीमुळेच मुंबईला या सामन्यात तीन गुण मिळवता आले. सरावातही तो कठोर मेहनत घेत असतो. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून सामना जिंकून देण्याची क्षमता सर्फराजमध्ये आहे.

– आदित्य तरे, मुंबईचा कर्णधार

मुंबईकडून रणजी स्पर्धेत त्रिशतक झळकावणारा सर्फराज हा सातवा फलंदाज ठरला. यापूर्वी अजित वाडेकर, सुनील गावस्कर, विजय र्मचट, संजय मांजरेकर, वसिम जाफर आणि रोहित शर्मा या सहा जणांनी अशी किमया साधली होती.

यंदाच्या हंगामातील हे तिसरे त्रिशतक ठरले. बंगालच्या मनोज तिवारी आणि मिझोरामच्या तरुवर कोहली यांनीसुद्धा या हंगामात त्रिशतके झळकावली आहेत.

संक्षिप्त धावफलक

* उत्तर प्रदेश (पहिला डाव) : ८ बाद ६२५ डाव घोषित

* मुंबई (पहिला डाव) : १६६.३ षटकांत ७ बाद ६८८ डाव घोषित (सर्फराज खान नाबाद ३०१, सिद्धेश लाड ९८, आदित्य तरे ९७; अंकित राजपूत ३/१३३)

* निकाल : सामना अनिर्णित (मुंबईला पहिल्या डावात आघाडी)

* गुण : मुंबई ३, उत्तर प्रदेश १

* सामनावीर : सर्फराज खान