भारताने निदहास चषक जिंकला आणि भारतीय चाहत्यांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन सेलिब्रेशन केले. समाजमाध्यमांवरून भारतीय संघाचे अनेकांनी विशेष अभिनंदन केले. त्याचप्रमाणे अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत संयम राखून भारतासाठी विजयश्री खेचून आणणाऱ्या दिनेश कार्तिक खऱ्या अर्थाने या सामन्याचा हिरो ठरला. अवघ्या आठ चेंडूंमध्ये २९ करणाऱ्या कार्तिकने अगदी शेवटच्या दोन षटकांमध्ये सामना भारतीय संघाच्या बाजूने वळवला. कार्तिकच्या या खेळीची अनेकांनी स्तुती केली मात्र भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने दिलेली शब्बासकी आणि स्तुती नेटकऱ्यांना जास्तच आवडली.

नेहमीच हटके ट्विटस, शुभेच्छा आणि शाब्दिक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सेहवागने सामना जिंकल्यानंतर एक मजेदार फोटो ट्विट केला आहे. अंतिम सामन्यात शेवटच्या दोन षटकांमध्ये ३४ धावा करायचा असल्या तरी आम्हाला (भारतीय संघाला) काही फरक पडत नाही अशा अर्थाचे ट्विट केले आहे. या ट्विटबरोबर त्याने तन्नू वेड्स मन्नू रिटर्सन सिनेमातील जीमी शेरगीलच्या तोंडचा एक संवाद त्याच सिनेमातील पात्राच्या फोटोसहीत ट्विट केला आहे. या फोटोवर हमको घंटा फरक नाही पडता असे वाक्य लिहीलेले आहे. या ट्विटमध्ये सेहवागने #DineshKarthik हा हॅशटॅग वापरला आहे. म्हणजेच १२ चेंडूत ३४ धावा करायच्या असल्या तरी दिनेश कार्तिक सारख्या खेळाडूला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही किंवा त्याचा दबाव त्याच्यावर नसतो असेच सेहवागला या ट्विटमधून सांगायचे आहे. आणि या अशा ‘ठग’ ट्विटच्या माध्यमातून एकीकडे दिनेश कार्तिकची स्तुती करताना दुसरीकडे बांगलादेश संघाला सेहवागने त्यांची जागा दाखवून दिल्याची भावना चाहत्यांनी या ट्विटखालील कमेन्टमध्ये व्यक्त केली आहे. म्हणूनच सेहवागचे ‘एक तीर से दो निशाणा’वाले ट्विट व्हायरल झाले आहे.

हे ट्विट नेटकऱ्यांना भलतेच आवडले असून ते साडेअकरा हजाराहून अधिक जणांनी रिट्वीट केले असून ६२ हजारहून अधिक जाणांनी हे ट्विट लाईक केले आहे. तर या ट्विटवर दोन हजारहून अधिक जणांनी कमेन्ट केली आहे.

अंतिम सामना आणि मालिका जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या दोन षटकांमध्ये ३४ धावांची गरज असताना कार्तिकने १९ व्या षटकात चक्क २२ धावा कुटल्या आणि शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी केवळ १२ धावांची गरज होती. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना कार्तिने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला सामना आणि मालिका विजय मिळवून दिला.

सेहवागबरोबरच इतर भारतीय खेळाडू या विजयाबद्दल काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात…