ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पावसानेच बॅटिंग केली. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पंच आणि सामनाधिकाऱ्यानं आजच्या दिवसाचा खेळ थांबवला आहे. उद्या, रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवसाच्या खेळाला अर्धा तास लवकर सुरुवात होणार आहे. दुसऱ्या दिवासाखेर भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदल्यात ६२ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप ३०७ धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या जोडीनं मैदानावर तग धरला आहे. पुजारा ८ तर रहाणे २ धावांवर खेळत आहे.

ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. युवा शुबमन गिलला कमिन्सनं सुरेख चेंडूवर माघारी पाठवलं. दुसरीकडे रोहित शर्मानं स्थारवल्यानंतर नॅथन लायनच्या गोलंदाजीवर खराब फटका मारुन आपली विकेट फेकली. रोहित शर्मानं ६ चौकारांच्या मदतीन ४४ धावांची खेळी केली. रोहित आणि शुबमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. दुसऱ्या सत्रात भारतीय संघानं २६ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ६२ धावा केल्या आहेत. भारतीय संघ पहिल्या डावात अद्याप ३०७ धावांनी पिछाडीवर आहे. पुजारा-रहाणे जोडीनं भारीय संघाची आणखी पडझड होऊ दिली नाही. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ३७ चेंडूचा सामना केला. पुजारा ८ आणि रहाणे २ धावांवर खेळत आहेत.

भारतीय संघाच्या युवा गोलंदाजांनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांवर रोखलं. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेन यानं १०८ तर कर्णधार टिम पेन यानं ५० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. भारतीय संघाकडून नटराजन, सुंदर आणि शार्दुल यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर मोहम्मद सिरजला एक विकेट मिळाली.