करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या बहुतांश क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसी आणि अनेक क्रिकेट बोर्ड प्रेक्षकांविना सामने खेळवण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. अद्याप याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसून, बीसीसीआय देशात क्रिकेटची बंद पडलेली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला जुलै महिन्यात तिरंगी मालिका खेळण्याचं निमंत्रण दिलं होतं. बांगलादेशच्या संघही या मालिकेत सहभागी होणं श्रीलंकेला अपेक्षित आहे. श्रीलंकेनंतर आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डही भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आफ्रिका दौरा करेल यासाठी आशादायी आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे हंगामी कार्यकारी अध्यक्ष जॅक फॉल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दौऱ्याबद्दल क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि बीसीसीआय या दोन्ही बोर्डांमध्ये चर्चा सुरु असल्याचं फॉल म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यातील भारतीय संघाचा प्रस्तावित टी-२० दौरा हा आयसीसीच्या नियमांनुसार नाहीये. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे संचालक ग्रॅम स्मिथ आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात फेब्रुवारी महिन्यात याविषयी चर्चा झाली होती. यानंतर २० मे रोजी दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये टेलि-कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हा दौरा निश्चीत झाल्याचं फॉल यांनी सांगितलं. दोन्ही क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना सरावाची संधी कशी उपलब्ध करुन देता येईल याची चाचपणी करत आहेत.

न्यूझीलंड दौऱ्यावरुन भारतात आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतासोबत ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार होता. याच दरम्यान संपर्ण जगभरात करोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. धर्मशाळा येथील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर उर्वरित दोन सामने बीसीसीआयने करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता रद्द केले. त्यामुळे एकही सामना न खेळता दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतामधून माघारी परतला होता.