भारताचा आज स्वातंत्र्यदिन. भारतीय क्रिकेट संघ सध्या भारतात नाही. सध्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ कसोटी मालिका खेळत असून तेथे पाच सामन्यांच्या मालीकेत भारत २-०ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आता भारताला पुढील सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. किंवा २ सामने जिंकून १ सामना अनिर्णित राखणे कर्मप्राप्त आहे. लॉर्ड्स वर झालेल्या सामन्यात भारताला अत्यन्त लाजिरवाणा पराभव लागला. त्यामुळे कर्णधार कोहलीवर चाहत्यांनी सडकून टीका केली. त्यामुळे कोहलीने आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. आमची साथ सोडू नका, असे भावनिक आवाहन त्याने काल चाहत्यांना उद्देशून केले.

दरम्यान, आज टीम इंडियाने भारतीय चाहत्यांसाठी एक विशेष व्हिडीओ तयार केला आहे. सामान्यतः संघातील महत्वाचे खेळाडू किंवा देशातील प्रसिद्ध व्यक्ती यांचा व्हिडिओत समावेश असतो. पण या व्हिडिओत विविध सामन्यात हजर असलेले भारतीय चाहते समाविष्ट करण्यात आले आहेत. या व्हिडिओद्वारे चाहत्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

 

‘टीम इंडिया’च्या वेरिफाइड इंस्टाग्राम अकाउंटवरून ही व्हिडीओ पोस्ट करण्यात आली असून यात विविध चाहत्यांचे व्हिडीओ एकत्र करण्यात आले आहेत. या व्हिडिओला सुमारे २ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. BCCI आणि भारतीय संघाच्या वतीने साऱ्यांना या व्हिडिओतून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.