2023च्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान भारत यजमान पाकिस्तानचा दौरा करेल, अशी आशा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) व्यक्त केली आहे. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी म्हणाले की, भारत दौरा पाकिस्तान क्रिकेटसाठी मोठा ब्रेक ठरेल. दोन्ही देशांकडे या स्पर्धेसाठी विंडो नसल्यामुळे 2021ची आशिया चषक स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

एका वृत्तसंस्थेशी केलेल्या बातचीतमध्ये मणी म्हणाले, “यावर्षी श्रीलंकेत होणारा आशिया चषक घेणे शक्य नाही. जूनमध्ये विंडो होती. मात्र, आम्ही पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने खेळत आहोत आणि भारतही या काळात न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारताला इंग्लंडमध्ये दोन आठवडे क्वारंटानमध्ये राहावे लागेल.”

”भारताचा पाकिस्तान दौरा हे मोठे यश”

पाकिस्तानमध्ये श्रीलंकेतील खेळाडूंवर झालेल्या दहशतवदी हल्ल्यांतर अनेक देशांनी पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास विरोध दर्शवला होता. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बलाढ्य संघासोबत सामन्यांच्या आयोजनासाठी संघर्ष करताना दिसला. आगामी आशिया चषकादरम्यान भारताने पाकिस्तानला भेट दिली, तर ते मोठे यश असेल, असे मणी यांना वाटते.

ते म्हणाले, “2023मध्ये पाकिस्तान आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करेल. या स्पर्धेत भारताचा सहभाग पाकिस्तान क्रिकेटसाठी उत्तम यश ठरेल. मला आशा आहे की तोपर्यंत राजकीय संबंधही मजबूत होतील.”

यंदा भारत टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. या स्पर्धेतील सहभागाविषयी मणी यांनी आपले मत दिले. ते म्हणाले, “आयसीसीने असे आश्वासन दिले आहे की, टी-20 वर्ल्ड कप पाकिस्तानशिवाय होऊ शकत नाही. ग्रेग बार्कले यांच्याशी या मुद्दयावर चार वेळा चर्चा झाली आहे.”