विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारताने विंडीजवर ४ गडी राखून मात केली. तर दुसऱ्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर भारताने २२ धावांनी सामना जिंकला. या मालिकेतला अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांना आपली छाप पाडता आलेली नाहीये. रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. तर विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये सुरेश रैनाचा विक्रम मोडीत काढला.

दुसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने २३ चेंडूत २८ धावांची खेळी केली. यासोबतच विराट कोहली सर्व प्रकारच्या टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहलीच्या नावावर सध्या ८४१६ तर सुरेश रैनाच्या नावावर ८३९२ धावा जमा आहे. याचसोबत विराट आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या एकूण खेळाडूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आला आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

  • ख्रिस गेल (३८४ सामने) – १२ हजार ८०८ धावा
  • ब्रँडन मॅक्युलम (३७० सामने) – ९ हजार ९२२ धावा
  • कायरन पोलार्ड (४७७ सामने) – ९ हजार ३७३ धावा
  • डेव्हिड वॉर्नर (२७१ सामने) – ८ हजार ८०३ धावा
  • शोएब मलिक (३४५ सामने) – ८ हजार ७०१ धावा
  • विराट कोहली (२६८ सामने) – ८ हजार ४१६ धावा
  • सुरेश रैना (३१९ सामने) – ८ हजार ३९२ धावा
  • रोहित शर्मा (३१६ सामने) – ८ हजार २९१ धावा

दरम्यान, भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा ८२९१ धावांसह विराट आणि रैनाच्या पाठोपाठ आठव्या क्रमांकावर आहे.