इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत नवोदित यष्टीरक्षक ऋषभ पंतने आपल्या कामगिरीची दखल सर्वांना घ्यायला लावली. अखेरच्या कसोटी सामन्यात लोकेश राहुलसोबत शतकी भागीदारी करत कसोटी क्रिकेटमधलं आपलं पहिलं शतक झळकावलं. मात्र २०१९ विश्वचषकाचा विचार करत असता वन-डे संघात धोनीचं संघात यष्टीरक्षक म्हणून असणं गरजेचं असल्याचं मत माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने व्यक्त केलं आहे. तो India TV वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“जरीही ऋषभ पंतची वन-डे संघात निवड झाली, तरीही तो १५-१६ सामन्यांपेक्षा जास्त सामने खेळू शकणार नाही. ऋषभ पंत आक्रमक फलंदाज आहे. तो मैदानात चांगले षटकार खेचू शकतो, मात्र धोनीने आतापर्यंत एकट्याच्या जीवावर भारताला सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे २०१९ पर्यंत धोनी संघात असणं गरजेचं आहे.” सेहवागने आपलं मत मांडलं.

दुबईत आजपासून आशिया चषकाचा रणसंग्राम सुरु होतो आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या विजयाच्या शक्यतांबद्दल विचारलं असता सेहवाग म्हणाला, “भारत यंदाचा आशिया चषक जिंकेल याची मला खात्री वाटते. मागच्या स्पर्धेच्या तुलनेत श्रीलंकेचा संघ यंदा मजबूत वाटत नाही. पाकिस्तान आणि बांगलादेश हे संघ भारताला चांगली टक्कर देऊ शकतात, मात्र त्यांच्या कामगिरीतही फारसं सातत्य राहिलेलं नाहीये. त्यामुळे वन-डे सामन्यांचा विचार करता भारतीय संघाची मायदेशी आणि परदेशी चांगली कामगिरी राहिलेली आहे, यासाठी यंदाचा आशिया चषक भारत जिंकू शकतो.”