रविवार विशेष

रणजी, दुलीप, देवधर करंडक आदी स्पर्धा भारतीय क्रिकेट संघाच्या प्रवेशाची दारे समजली जातात. भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न पाहणारा प्रत्येक खेळाडू या स्पर्धामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी कशी करता येईल हे पाहत असतो. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये या वृत्तीचा अभावच दिसून येतो. त्यामुळेच रणजी स्पर्धेत यंदा महाराष्ट्राचे आव्हान साखळी गटातच संपुष्टात आले.

क्रिकेटमध्ये एकदिवसीय, ट्वेन्टी-२० स्पर्धाचा समावेश झाल्यानंतर बरेचसे खेळाडू त्याच्या प्रभावाखाली कसोटी क्रिकेटला विसरले असावेत असेच चित्र अनेक संघांमध्ये दिसून येऊ लागले आहे. बाद फेरीचा दावेदार नसलेला संघही रणजी स्पर्धेत अनपेक्षित विजय नोंदवत भल्या भल्या संघांना रडकुंडीला आणत आहे. ज्या प्रमाणे एखाद्या स्पर्धेत भारतीय संघाबरोबर पाकिस्तानचा संघ पराभूत झाला तर आपल्याला जास्त आनंद होतो. तद्वत आपल्याबरोबर मुंबईचा संघही साखळी गटातच गारद झाला, यातच महाराष्ट्राच्या क्रिकेट संघटकांना समाधान वाटत असेल. मात्र आपले खेळाडू नेमके कोठे कमी पडतात, आंतरराष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी आपले नाणे खणखणीत करताना ते कोठे चुकतात, याचा फारसा कोणीही अभ्यास करीत नाही.

मर्यादित षटकांच्या प्रभावाचा महाराष्ट्राच्या खेळाडूंवर भरपूर अंमल चढला आहे, असेच सातत्याने दिसून येत आहे. रणजी सामना हा चार दिवसांचा सामना असतो व तेथे पाय रोवूनच खेळावे लागते हे तत्त्व त्यांच्या अंगी दिसून येत नाही. सलामीच्या फलंदाजांकडून डावाचा भक्कम पाया रोवण्याची कामगिरी अपेक्षित असते. यंदा एकाही सामन्यात महाराष्ट्राच्या फलंदाजांना अर्धशतकी भागीदारी रचता आली नाही. स्वप्निल गुगळे, हर्षद खडीवाले, मुर्तूझा ट्रंकवाला आदी सलामीवीरांनी सपशेल निराशा केली. मोठी भागीदारी रचण्यात पहिल्या फळीतील फलंदाजांना जमलेच नाही. ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, रोहित मोटवानी यांनी फलंदाजीत यशस्वी कामगिरी केली खरी, मात्र बऱ्याच वेळा त्यांच्याकडून मर्यादित षटकांच्या सामन्याला अनुरूप खेळ केला गेला. निर्णायक नाही, परंतु निदान पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण मिळविण्यासाठी आवश्यक असणारी फलंदाजी महाराष्ट्राकडून यंदा झालीच नाही.

फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही महाराष्ट्राचे खेळाडू कमी पडले. घरच्या मैदानावर त्यांची गोलंदाजी फोडून काढीत कर्नाटकने सहाशे धावांचा डोंगर रचला. कर्नाटकच्या मयांक अगरवाल याने महाराष्ट्राविरुद्ध नाबाद त्रिशतक टोलविले हेच महाराष्ट्राच्या गोलंदाजांमधील मर्यादा सिद्ध करणारे आहे. दिल्ली संघाने महाराष्ट्राविरुद्ध चारशे धावांपलीकडे मजल गाठली. या दोन्ही सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी खूपच निराशा केली. चिराग खुराणा, प्रदीप दाढे व निकित धुमाळ यांचा अपवाद वगळता सामन्यात विजय मिळवून देण्याची क्षमता एकाही गोलंदाजांकडे नाही हे पुन्हा सिद्ध झाले. गोलंदाजीस अनुरूप क्षेत्ररक्षण करण्याबाबतही महाराष्ट्राच्या मर्यादा स्पष्टपणे दिसल्या. केदार जाधवची अनुपस्थिती महाराष्ट्राला प्रकर्षांने जाणवली. त्याच्या अनुपस्थितीत महाराष्ट्राचा संघ विस्कळीत झाल्यासारखा होता.

कर्नाटक, दिल्ली यांच्यासारख्या संघातील खेळाडू भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी जिद्दीने खेळतात. लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे यांच्यासारखे कितीतरी खेळाडू रणजी स्पर्धेद्वारेच भारतीय संघात आले आहेत. त्यांच्या यशाचे रहस्य कोणते होते, याचा अभ्यास महाराष्ट्राच्या खेळाडूंनी करणे नितांत आवश्यक आहे.

महाराष्ट्राच्या खेळाडूंना स्थानिक स्तरावरील चार दिवसांचे सामने खेळण्याची सवयच नाही. आजकाल ट्वेन्टी२० किंवा एकदिवसीय सामनेच खेळविले जातात. चार दिवसांच्या सामन्यांच्या फारशा स्पर्धाच स्थानिक स्तरावर होत नाहीत. किती दिवस जुन्या खेळाडूंवर विसंबून राहणार याकडेही त्यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्याचप्रमाणे दुसऱ्या फळीतही अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश करण्याची गरज आहे. रोहन दामले, जगदीश झोपे यांच्यासारख्या गुणवान खेळाडूंना संधी दिली पाहिजे. एखादा अनुभवी खेळाडू खेळू शकला नाही तर त्याच्याऐवजी त्याची अनुपस्थिती भरून काढण्याची क्षमता असणाऱ्याच खेळाडूला प्राधान्य दिले पाहिजे. अन्य संघांमध्ये तरुण रक्तास अधिकाधिक संधी देत असतानाच महाराष्ट्राची भर ज्येष्ठ खेळाडूंवरच दिसून येत आहे. युवा खेळाडूंना संधी मिळाल्यास ते जास्त आत्मविश्वासाने खेळतात. महाराष्ट्राच्या निवड समितीने व प्रशिक्षकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

मिलिंद ढमढेरे milind.dhamdhere@expressindia.com