ऑलिम्पिक तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी पदकाची कमाई केली आहे. सुपर सीरिज स्पर्धामध्येही भारतीय खेळाडूंनी पदकांवर मोहोर उमटवली आहे. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत केवळ सात कांस्यपदके पटकावली आहेत. यंदा ही उणीव भरून काढण्याची उत्तम संधी आहे, असे उद्गार नऊ वेळा राष्ट्रीय विजेती माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट हिने व्यक्त केले. सायना नेहवालचा फॉर्म, सिंधूकडून अपेक्षा, ज्वालाची माघार, पुरुष संघाची ताकद यासंदर्भात अपर्णाशी केलेली बातचीत..
आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी अपेक्षेनुरूप का झालेली नाही?
सायनाच्या रूपाने भारताला ऑलिम्पिक पदक मिळाले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी दिमाखदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत मात्र भारतीय खेळाडूंना मर्यादित स्वरूपाचे यश मिळाले आहे. हा इतिहास सुधारण्याची उत्तम संधी यंदा भारतीय बॅडमिंटनपटूंकडे आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या तुलनेत आशियाई क्रीडा स्पर्धेत अव्वल खेळाडूंची संख्या वाढते. चीनच्या खेळाडूंच्या समावेशामुळे प्रत्येक फेरी खडतर होते. या स्पर्धेच्या निमित्ताने आशिया खंडातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये मुकाबला रंगतो. चीनच्या मक्तेदारीची चर्चा होते, मात्र त्यांच्या बरोबरीने जपान, थायलंड, तैवान, इंडोनेशिया सातत्याने चांगले खेळाडू घडवत आहेत. त्यामुळे जेतेपदापर्यंतची वाटचाल अवघड होऊ शकते. या सर्व देशांना टक्कर देऊन विजय मिळवत आशियाई स्तरावर भारताचा झेंडा रोवण्याची भारतीय बॅडमिंटनपटूंना सर्वोत्तम संधी आहे.
खराब फॉर्म, दुखापतींशी झगडणारी सायना हीच भारताचे पदकाचे आशास्थान आहे का?
ऑलिम्पिकनंतर सायनाच्या कामगिरीत घसरण झाली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर तिने सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत तिने दुखापतीमुळे माघार घेतली. आशियाई स्पर्धेपूर्वी गोपीचंदऐवजी विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा तिने निर्णय घेतला. सायनाने आतापर्यंत अभिमानास्पद कामगिरी करत देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सायनाला उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. सायनाच्या वाढत्या यशाबरोबर प्रतिस्पध्र्यानी तिच्या खेळातील कच्चे दुवे शोधून काढले आहेत. दुखापतींमुळे तिच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. मात्र या सगळ्यातून बाहेर पडून जिंकण्याची मानसिक कणखरता तिच्याकडे आहे. ज्वालाची माघार आणि सिंधू यामुळे सायनावर भारताच्या पदकाची जबाबदारी आहे.
सिंधूवर अपेक्षांचे दडपण आहे का?
लहान वयातच सिंधूने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सलग दोन वेळा कांस्यपदक, राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक ही सिंधूची भरारी भारतीयांसाठी आशादायी चित्र आहे. सिंधू आता शिकत असून तिच्याकडून चुका होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावण्यासाठी तिच्याकडे खूप वेळ आहे. चाहत्यांच्या अपेक्षा ती पूर्ण करते, ही चांगली गोष्ट आहे. मात्र अपेक्षांचा अतिरेक नको.
ज्वालाच्या माघारीच्या निर्णयामुळे दुहेरीची बाजू कमकुवत झाली आहे का?
निश्चितच. ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा ही अनुभवी जोडी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी यशही मिळवले आहे. ज्वाला खेळू शकणार नसल्याने युवा खेळाडूंना जबाबदारी स्वीकारण्याची चांगली संधी आहे. अश्विनीने प्रज्ञा गद्रेच्या साथीने खेळताना चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे ही जोडी नवीन नाही.
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2014 रोजी प्रकाशित
आशियाई स्पर्धेत भारताने वर्चस्व गाजवावे -अपर्णा
ऑलिम्पिक तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी पदकाची कमाई केली आहे. सुपर सीरिज स्पर्धामध्येही भारतीय खेळाडूंनी पदकांवर मोहोर उमटवली आहे.

First published on: 13-09-2014 at 01:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aparna popat on asian games